सिंधुदुर्ग : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत हे सरकार टिकणार नाही असा दावा वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपासून ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यातच आता भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यातील सरकार मार्च २०२१ मध्ये कोसळणार असल्याचे पुन्हा एकदा भाकीत केले आहे.
चिपी विमानतळाच्या पाहणी दौऱ्यानंतर नारायण राणे यांनी हे भाकीत वर्तवले आहे. राज्यातील सरकारविषयी बोलताना, “येत्या 2021 च्या मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार सत्तेवर येणार आहे. केंद्रातही भाजप आणि महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर येणार. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेंपररी असून ते लवकरच लाँग रजेवर जाणार”, असा दावा राणेंनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. नारायण राणे यांनी अनेकवेळा हे सरकार कोसळेल, असा दावा केला. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचं स्पष्टीकरण दिलेआहे. पण महाविकास आघाडीच्या आंतर्गत कलहातून हे सरकार पडलं तर चांगलं पर्यायी सरकार स्थापन करु, अशी भूमिका त्यांनी अनेकवेळा मांडली आहे.