मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. बदली झाल्यानंतर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे राजकारण तापले असताना डॅशिंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी NIA तपास संस्थेच्या आधीच मनसूख हिरेन प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आलेला आहे.
सचिन वाझे आणि मनसूख हिरेन प्रकरणाचा गुंता वाढत चालला होता. मात्र प्रकरणात आता एटीएसला मोठं यश मिळालं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून, माहिती दिली आहे.
शिवदीप लांडे म्हणाले की, अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो, ज्यांनी मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायिक पद्धतीने छडा लावला. ही केस माझ्या कारकिर्दीतील सर्वात कठीण केस पैकी एक होती.