मुंबई – विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊन आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करू या, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, की लढवय्या महाराष्ट्र अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटले आहोत. कोरोनाच्या संकटातच निसर्गाची अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता सामोरे जात आहोत. कोरोनाच्या विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारीफ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणूचाच पाठलाग करून, त्याला रोखण्याचा प्रयत्न आपले कोरोना योद्धे करत आहेत, असेही ते म्हणाले.
कोरोनाला रोखण्यासाठी सगळ्यांनीच खूप संयम दाखवला आहे. सर्वधर्मीयांनी आपले सण, उत्सव घरीच साजरे केले आहेत. उद्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा उत्सव साजरा करणार आहोत. दसरा संकटावर, वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे-शारीरिक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रयत्नातूनच आपण कोरोनारूपी रावणाचा नाश करू आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करू, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञानावरील ज्ञानाच्या, अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याच्या, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदाने, उत्साहाने, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करून साजरा करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी. राज्यातून, देशातून, जगातून कोरोना संकटाचे उच्चाटन व्हावे, अशा शुभेच्छाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.