…तर तेरावा देखील महावितरण कार्यालयातच
महावितरण विभागाकडून संदेश च्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले. जर तीन दिवसामध्ये कामाकडे दुर्लक्ष केलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही तर 13 वा देखील महावितरण कार्यालयातच घातला जाईल असा ईशारा प्रहार संघटना आणि मयत आढाव परिवाराच्या वतीने देण्यात आला आहे.
नगर – श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील तरुण शेतकरी संदेश अनिल आढाव याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्यास महावितरणचे कर्मचारी जबाबदार असल्याचे सांगत आढाव याचे नातेवाईक व प्रहार संघटनेच्या वतीने महावितरणचा निषेध करत नगर येथील महावितरणाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आज सकाळी दशक्रियाविधी करण्यात आला.
सारोळा सोमवंशी येथे 3 नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता आढाव कुटुंब शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. घरी येत असताना शेतात पडलेल्या विद्युत तारेचा वीजेचा धक्का संदेशला लागला त्यातच त्याचा मृत्यू झाला. या शेतात पडलेल्या तारेविषयीची तक्रार महावितरण विभागास दिली होती. मात्र महाविरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही विद्युत तारा शेतात तशाच पडून होत्या. त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. या घटनेचा निषेध म्हणून आढाव कुटुंबीयांनी सोमवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संदेश याचा दशक्रिया विधी केला.
यावेळी श्रीगोंद्यातील सारोळा सोमवंशी येथील गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. प्रवचनकार अजय बारस्कर महाराज, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, विजू बाळू भंडारी, कृष्णा खांबकर, संतोष गायकवाड, विजू बापू भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.