कोल्हापूर : करोनाच्या भीतीमुळे राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे दख्खनचा राजा जोतिबाच्या शेवटच्या खेट्यावरही करोनाचा परिणाम दिसला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढला होता.
त्यानंतर जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम,अनेक यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. करोनाच्या भीतीमुळे आणि खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाने दर्शन बंद निर्णय घेतल्याने चैत्र यात्रेवरही परिणाम झाला असून ती सुद्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.