-राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
“देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन होतं…’ असे म्हणतात. आमच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी आषाढी वारी. सन 2018 मध्ये आषाढीनिमित्त पंढरपुरातच होतो, पण पुण्यात अचानक तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने दशमीच्या रात्रीच पुण्याला परत निघावं लागलं होतं… श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन… पंढरपुरात येऊनही श्रींचं प्रत्यक्ष दर्शन न झाल्याची रुखरुख मनात होतीच…
सध्या करोना विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. संपूर्ण विश्वावर महामारीचं सावट आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीप्रमाणं पार पडणं शक्य नव्हतं. अनेकांना इच्छा असूनही वारीमध्ये सहभागी होता आलं नाही. परिस्थितीमुळे घरात राहूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागलं. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता भक्तिभावानं तथापि, शासकीय नियमांचं पालन करून साजरा होणार होता. या वर्षी बुधवार दि. 1 जुलै, 2020 रोजी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक श्रींची शासकीय महापूजा करणार असल्यानं शासकीय स्तरावर प्रसिद्धीविषयक कार्यवाही करणं गरजेचं होतं.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशासाठी आरोग्यविषयक सर्वच खबरदारी घेण्यात येत होती. सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आणि पंढरपूर उपमाहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी आषाढी वारी वृत्तांकनासाठी येणाऱ्या सर्वांची करोना चाचणी करणे बंधनकारक असल्याचं कळवलं. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र पाठवून आमची करोना चाचणी करण्याची विनंती केली. ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी तातडीने करोना चाचणी केली. पुण्यामध्ये 9 मार्चपासून करोना वृत्तांकन करत असल्यानं आमच्या सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण सर्वांचीच चाचणी निगेटिव्ह आली.
दरम्यान, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना वाहन प्रवेश पासबाबत विनंती केली, त्यांनीही तातडीने वाहन पास उपलब्ध करून दिले. आवश्यक ती पूर्वतयारी झाल्यानंतर पुण्याहून दोन पथकं पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. पथकामध्ये माहिती सहायक संदीप राठोड, विलास कसबे, व्हिडीओ कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार नितीन सोनवणे, चंद्रकांत खंडागळे, सुनील झुंजार, जितेंद्र खंडागळे यांचा समावेश होता. प्रत्येकाला आषाढी वारीचा पूर्वानुभव असल्यानं पंढरपूरपर्यंतचा मोकळा रस्ता पाहून त्यांच्या गप्पांमध्ये वारी वृत्तांकनाच्या जुन्या आठवणींचाच समावेश होता.
ना टाळ-मृदुंगाचा गजर, ना भागवत पताका घेतलेले वारकरी… ना तुळशी डोक्यावर घेतलेल्या मायमाऊली… ना विठूनामाचा जयघोष… पूर्वी वारकऱ्यांच्या गर्दीमुळे वैताग वाटायचा, पण आता रस्त्यात कुठेही वारकरी दिसत नाही… टाळ-वीणा-मृदुंगाच्या साथीनं “जय जय रामकृष्ण हरी’, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय’, असं कानावर पडत राहायचं… भक्तिरसाचा महापूर पाहून आलेला वैताग क्षणात दूर व्हायचा. मन आनंदी, उल्हासित व्हायचं. आज मात्र यापैकी काही अनुभवायला मिळालं नाही. म्हणून त्यांचं मन खट्टू होतं. पण त्याचवेळी ही “आगळी-वेगळी वारी’ अनुभवायला मिळत असल्याचा एक वेगळाच आनंद होता.
रस्त्यात ठिकठिकाणी पोलीस चौक्या होत्या. मुख्यमंत्री हे वाहनानं येणार असल्यानं योग्य ती दक्षता घेण्यात आली होती. परिसरातून कोणी वारकरी पंढरपुरात येऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही करण्यात येत होती. पोलीस प्रत्येकाशी प्रेमानं आणि समजुतीनं बोलत होते. नेहमी असणारा ताण कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता.
दशमीच्या रात्री 8 वाजता आमचं पथक पंढरपुरात पोहोचलं. संचारबंदीमुळे रस्त्यावर सामसूम दिसत होती. चंद्रभागा तीरावरही शुकशुकाट जाणवत होता. संपूर्ण बाजारपेठ बंद होती. पोलिसांचा मात्र कडेकोट बंदोबस्त दिसत होता. ज्या रस्त्यावरून पायी जायला अर्धा-पाऊण तास लागायचा, त्या रस्त्यावरून 10 मिनिटांत जाता आलं, याचं पथकातील प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं. पंढरपूरच्या उपमाहिती कार्यालयात पोहोचल्यावर प्रसिद्धी नियोजनाचा आढावा घेतला. आवश्यक ते सर्व नियोजन झालेलं होतं.
पथकाची भक्तनिवासमध्ये निवासाची व्यवस्था होती. एकादशीच्या पहाटे श्रींची महापूजा होणार असल्यानं रात्रीच मंदिरात जावं लागणार होतं. स्नान आणि नंतर भोजन करून रात्री 10 वाजता मंदिरात प्रवेश केला. मंदिरावर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातही फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान, महापूजेपूर्वी मंदिर परिसर दोनदा फवारणी करून निर्जंतूक करण्यात आला. नित्यपूजा, पाद्यपूजेला उपस्थित राहून दर्शन सोहळा अनुभवायला मिळाला.
पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच मानाचे वारकरी प्रतिनिधी ठरलेले विणेकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे, त्यांच्या पत्नी अनुसूया बडे यांच्या उपस्थितीत श्रींची महापूजा संपन्न झाली. परंपरेप्रमाणं विठ्ठल-रुक्मिणीमातेची भक्तिभावानं पूजा करण्यात आली. फुलांचा आणि तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मानाचे वीणेकरी दाम्पत्याचा सत्कार केला. करोनाचं संकट लवकर नष्ट कर, असं साकडं देवाला घातल्याचं त्यांनी सत्कारप्रसंगी सांगितलं.
यंदाच्या आषाढी वारीसाठी अनेकांची इच्छा असूनही पंढरपूरला येता आलं नाही. आम्हाला मात्र शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून का होईना पंढरपूरला जाता आलं. श्री विठ्ठल मंदिरात रात्री 10 वाजेपासून शासकीय महापूजा झाल्यानंतरही पहाटे साडेपाचपर्यंत श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचं डोळे भरून मनोभावे दर्शन घेता आलं. यापूर्वी न झालेल्या दर्शनाची खंत दूर झाली. आम्ही सारे एक प्रकारे भाग्यवंत ठरलो.