पुणे – सन 2019 पेक्षा 2020 मध्ये वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाडामुळे अंधारात बसावे लागण्याच्या घटना दीडपट वाढल्याचा आरोप “सजग नागरिक मंच’ने केला आहे. तसेच तांत्रिक बिघाडासंबंधिचा तपशील देणारे “विश्वासार्हतेचे निर्देशांक’ (रिलायबिलिटी इंडेक्स) महावितरणने प्रसिद्धच केले नसल्याचाही त्यांचा आरोप आहे.
आयोगाच्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा “विश्वासार्हतेचे निर्देशांक’ प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. यामधून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले आणि त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर जून 2020 नंतर हे निर्देशांक गेल्या सहा महिन्यांपासून प्रसिद्ध केले नाहीत, अशी तक्रारही “मंच’चे प्रतिनिधी विवेक वेलणकर यांनी केली आहे.
महावितरणने दिलेल्या चार्टनुसार जून 2020 या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 16,180 घटना घडल्या. ज्यामध्ये 4 कोटी 54 लाख 94 हजार 634 नागरिकांना एकूण 23 हजार 115 तास अंधारात बसावे लागले. डिसेंबर 2019 च्या चार्टनुसार या महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या 10,994 घटना घडल्या. ज्यामधे राज्यातील अडीच कोटी हून अधिक म्हणजे 2 कोटी 78 लाख 12 हजार 588 नागरिकांना एकूण 15 हजार 167 तास अंधारात बसावे लागल्याचे चार्टमधून दिसून येते.
पुणे झोनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या 713 घटना घडल्या; ज्यात पुणेकरांना 889 तास अंधारात बसावे लागले. जून 2020 मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या 1,524 घटना घडल्या. ज्यात पुणेकरांना 2,350 तास अंधारात बसावे लागले. यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय, की डिसेंबर 2019 पेक्षा जून 2020 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना अंधारात बसावे लागण्याच्या घटना आणि कालावधी यात दीडपटीने वाढ झाली आहे.
महावितरणच्या संकेतस्थळावर गेल्या 3 वर्षांचे चार्ट उपलब्ध आहेत. ते पाहता तांत्रिक बिघाडामुळे होणारा अंधार महाराष्ट्राच्या पाचवीलाच पूजल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्यतिरिक्त देखभाल दुरुस्तीसाठी आठवड्यातून एक दिवस (पुण्यात गुरुवारी) काही तासांचा नियोजनबद्ध अंधार आणि ग्रामीण भागातील भारनियमनामुळे होणारा अंधारदेखील असतोच.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच