अवघा 6 टक्केच जलसाठा
नगर: संपूर्ण नगर जिल्ह्यावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील धरणांसह अन्य जलाशयांमध्ये केवळ 5.82 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. आता उन्हाची तीव्र दिवसेंदिवस वाढ लागली असून असलेल्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन देखील झपाट्याने होत आहे. त्यामुळे धरणे खपाटीला गेले आहेत. गेल्या वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात 39 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा केवळ 5.82 टक्के उपयुक्त जलसाठा राहिल्याने या महिन्यात जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात भंडारदरा, निळवंडे, मुळा या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांची पाणीसाठ्याची एकूण क्षमता 59 हजार 135 दलघफु आहे. तर उपयुक्त पाणीसाठा हा 50 हजार 992 दलघफु आहे. सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये केवळ 2 हजार 972.46 दलघफु उपयुक्त पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला 19 हजार 987.97 दलघफु उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने तब्बल 17 हजार 015.51 दलघफु उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त जलसाठा अतियश कमी राहिला आहे. त्यामुळे जलसंकट तीव्र होत चालले आहे. सध्या जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. 771 पर्यंत टॅंकरची संख्या गेली असून आगामी पंधरा दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.
यंदा धरणांच्या लाभक्षेत्रात काय तो पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा ऑक्टोबर महिन्यांपासून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली. यंदा जिल्ह्यात 63 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून टॅंकर सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षाही यंदा पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. भंडारदरा धरणांवर उत्तरेतील तीन ते चार तर मुळा धरणामुळे दक्षिणेतील पाच तालुक्यांची पाण्याची तहान भागविण्यात येत आहे. चार तालुक्यांना कुकडीचे पाण्याचा आधार आहे. सध्या कुकडीचे पिण्यासाठी आवर्तन सोडणयात आले आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.
पाणी काटकसरीने वापरा
जलसाठ्याची स्थिती पाहता पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. विशेषतः शहरी भागांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. पण ग्रामीण भागाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याची जाणिव ठेवून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. महापालिकेकडून अद्याप पाणी कपातीचा निर्णय घेतला नाही. नगरसह राहुरीसाठी 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा जलसाठा राखीव करण्यात आला आहे. परंतू पाणी राखीव असले म्हणजे पाण्याची उधळपट्टी करणे टाळावे. पाणी वाया जाणार नाही यांची काळजी नगरकरांनी द्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.