भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील माळशिरस ते सासवड रस्त्यावरील असणारा पूल प्रवाशी वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. माळशिरस गावापासून अगदी जवळच हा पूल आहे . तर या पूल परिसरात शाळा आहे व पूलाच्या दोन्ही बाजूला झाडे वाढली असून लगेच वळण असल्यामुळे समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही.
पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार असून दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची गती जास्त असते. अशातच पुलावर एकाच बाजूला खड्डे पडल्याने सर्व वाहन चालक आपले वाहन खड्ड्यात आदळू नये म्हणून दुसऱ्या बाजूने आपले वाहन चालवतात. परिणामी कधी कधी दोन्हीं बाजूने येणारी वाहने समोरासामोर येतात यामुळे या पुलावर अपघात होण्याची आहे. परिणामी एकाला गाडी थांबवून दुसऱ्याला जाऊ द्यावे लागते.
पुलाच्या एका बाजूला शाळा व दुसऱ्या बाजूला स्मशानभूमी व जवळच एक वस्ती असल्याने या परिसरात कायम शाळकरी मुले, शेतकरी, ग्रामस्थ यांची रेलचेल असते.म्हणून या पुलाच्या कामाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.