पौड – मुळशीमध्ये सतत रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे आणि धुक्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले हरभरा, मसूर, तूर ही पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. कांद्याच्या रोपांना याचा फटका बसणार आहे, तसेच बांधावर लावलेले पावटे सध्या फुलोऱ्यावर होते, तो झोडपल्याने हाता तोंडाशी आलेला घास जाणार असल्याचे दिसत आहे.
तसेच सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी भात काढल्यानंतर पुढील पिकाकरिता केलेली शेतीची मशागत वाया जाणार असून, पुढील जे पीक घेणार होते, ते आता लांबणीवर पडणार आहे. पुढील घेणारे पीक बटाटा व इतर बागायत शेतीवर त्याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगराई पडण्याची भीती नागरिकांमध्ये असून नागरिकांनी घाबरून न जाता सध्या पाऊस पडत असल्याने वातावरणात बदल झाल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, बाहेरचा प्रवास टाळावा,
बाहेरचे तेलकट व इतर पदार्थ खाण्याचे टाळावे. घरचेच अन्न खावे कोणाला ही थोडा त्रास उद्भवल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे साई हॉस्पिटलचे डॉ. संतोष खेडकर यांनी सांगितले आहे.