नवी दिल्ली – आपल्या विरोधात मुंबईत जो खटला प्रलंबीत आहे तो सिमल्याच्या कोर्टात वर्ग करावा अशी मागणी करणारा अर्ज अभिनेत्री कंगना राणावत हिने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. मुंबईतील शिवसेनेचे नेते आपल्याशी शत्रुत्वाने वागत असल्याने तिथे आपल्या जीवाला धोका आहे असे कारण तिने यासाठी दिले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना नेतृत्वाखालील सरकार आपल्याला त्रास देत असून मुंबईत आपल्या विरोधात केस चालवली तर तिथे आपल्या जीविताला व मालमत्तेला मोठे नुकसान होण्याचा धोका आहे असे तिने म्हटले आहे.
प्रख्यात कवि जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून ही तक्रार व त्या अनुषंगाने लावण्यात आलेला खटला मुंबईतून सिमला कोर्टात वर्ग केला जावा अशी तिची प्रमुख मागणी आहे.
अख्तर यांनी कंगनाने दिलेल्या एका मुलाखतीच्या अनुषंगाने तिच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. तसेच काशीफ खान देशमुख नावाच्या इसमाने आपल्या विरोधात मुंबई पोलिसांकडे दाखल केलेली तक्रारही सिमल्यात वर्ग करावी अशी मागणीही तिने केली आहे. या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी कंगनाच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
कोविडच्या काळात डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात तिने जे एक ट्विट केले होते त्या अनुषंगाने खान यांनी तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यात कंगना आणि तिच्या बहिणीवर करण्यात आला आहे.
अंधेरीच्या महानगर न्यायदंडिधिकाऱ्यांच्या कोर्टातही आपल्या विरोधात खटला दाखल झाला आहे तोहीं तिकडेच वर्ग करावा अशी तिची मागणी आहे. एकाच प्रकरणात आपल्या विरोधात ज्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यातून माझ्या विरोधात तिथे मुंबईत किती आकसाचे वातावरण आहे हे स्पष्ट होते आहे असा दावाही तिने केला आहे.