बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस
वाघळवाडी – कऱ्हा नदीला पूर येऊन जेजुरीचा नाझरे (मल्हार सागर) जलाशय पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. प्रतिसेकंद 24 हजार क्यूसेसने पाणी नाझरे जलाशयातून नदीपात्रात सोडले जात असून बारामतीसह पुरंदर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाटबंधारे प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
IMD Mumbai: Due to very heavy rainfall at Saswad, 85000 cusecs of water was discharged from Nazare Dam. This will cause very severe floods in Baramati city. District Administration has been alerted. #Maharashtra
— ANI (@ANI) September 26, 2019
बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती भागात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी, नाले, ओढे व तलाव भरून वाहत आहेत. तब्बल आठ वर्षानंतर नाझरे धरणातून कऱ्हा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात येणारे पाणी पाहण्यासाठी मोरगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
बारामतीच्या ग्रामीण भागातील शेतकरी सतत पडणारा दुष्काळ आणि पाणी टंचाई यामुळे त्रस्त होता. जून महिन्यापासून दमदार पाऊस या भागात झालाच नव्हता. मंगळवारी पावसाचे पुनरागमन झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली. तब्बल चार ते पाच तास पाऊस सुरू होता. मोरगाव परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक वर्षानंतर हा पाऊस परतल्यामुळे एकीकडे आनंद झाला. सध्या, येथील बाजरी काढणीसह कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांच्या छावणीवर असलेल्या बळीराजाचे पुरते हाल झाले.