नागरीवस्तीसाठी “धोकादायक’ची पाटी लावून पाणीपुरवठा विभागाने झटकली जबाबदारी
– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1960च्या काळात बांधण्यात आलेल्या जनता वसाहत तसेच पर्वती परिसरातील टाक्यांची मोठी दुर्दशा झाली असून त्या कोसळण्याचा धोका आहे. या टाक्यांच्या दुरुस्तीकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे दुरुस्तीचे काम बाजूला ठेवून यावर तात्पुरता उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाने सदर ठिकाणी ही जागा धोकादायक असून या परिसरात वावरू नये, अशा आशयाची जुजबी पाटी लावून आपली जबाबदारी झटकली आहे.
पुणे शहरातील विविध विकासकामांवर मोठा खर्च केला जात असताना शहराच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेकडेच पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. जनता वसाहत, पर्वती परिसरात पाण्याच्या चार टाक्या आहेत. यातून 170 ते 172 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जनता वसाहत येथील सर्व्हे नंबर 109 येथील चौकोनी टाकीतून शहरातील मध्यवर्ती पेठांना पाणी पुरविले जाते. या टाकीच्या एका बाजूच्या भिंतीला चिर पडली असून स्लॅबलाही भेगा पडल्या आहेत. पर्वतीवरील टाक्यांमधून पद्मावती पंपिगला पाणीपुरवठा करून बिबवेवाडी, तळजाई येथून शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा केला जातो. येथील टाकीचा स्लॅब तुटला आहे.
दरम्यान, पर्वतीवर जुन्या टाकी शेजारीच 24 तास पाणीपुरवठा उपक्रमातून एल अँड टी कंपनीने दहा लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधली असल्याचे तसेच जुन्या टाक्यांच्या कामाची पाहणी करून एल अँड टी कंपनीमार्फत दुरुस्तीचे काम करणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
परंतु, अद्याप कोणतीही तांत्रिक तपासणी करण्यात आली नसल्याचे तसेच, या टाक्या जुन्या असून जीर्ण झाल्याने येथे नवीन टाक्याच बांधाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. विशेष म्हणजे कामाचे श्रेय घेणारे पर्वती मतदारसंघातील राजकीय नेते मात्र सदर विषयापासून अनभिज्ञ कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
पर्वती येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची दुरवस्था झाली असून प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न पडतो. नागरिकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का? स्लॅब तुटलेले असताना, टाक्यांचे नवीन भक्कम काम होणे गरजेचे असताना फक्त दुरुस्ती करून दुर्घटनेला आमंत्रण देऊ नये. संबधित धोकादायक काम तातडीने न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
– सूरज लोखंडे, विभागप्रमुख, शिवसेना-पर्वती
धोकादायक टाक्यांचे काम करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून कामे करण्यास वेळोवेळी सांगितले आहे. मात्र, निधीअभावी कामे करता येत नाहीत, असे उत्तर दिले जाते. इतका पाठपुरावा करूनही संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारी येथे पाहणी करण्यासही आलेले नाहीत.
– प्रिया गदादे, नगरसेविका, (राष्ट्रवादी पक्ष)
पुणे महानगरपालिका शहरात लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च करत आहे. मात्र, पाण्यासारख्या इतक्या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुन्या टाक्यांची दुरवस्था झाली असून यातून दुर्घटना झाल्यास यास जबाबदार कोण? नागरिकांच्या कररूपी पैशातून स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेली उधळपट्टी थांबवून जीवनावश्यक कामे लवकरात लवकर करावीत.
– ललित ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता
महापालिकेकडून धोकादायक टाक्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये या टाक्यांचाही समावेश आहे. लवकरच या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्यानंतर या टाकीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.
– अनिरुद्ध पावसकर, विभाग प्रमुख, पाणीपुरवठा, मनपा