नवी दिल्ली: देशातील नव्या करोनाबाधितांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांच्या आत आहे. त्यावरून करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचलनालयाने (डीजीएफटी) याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ‘कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटला निर्यातबंदीच्या यादीत टाकण्यात येत आहे. हा निर्णय त्वरित लागू करण्यात येत आहे,’ असे डीजीएफटीने अधिसूचनेत नमूद केले आहे.
करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट आल्यास भारताला मोठ्या संख्येने करोना चाचण्या कराव्या लागतील. त्याची तयारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाची तिसरी लाट आलीच, तर त्या परिस्थितीत देशातच टेस्टिंग किट उपलब्ध असावीत या उद्देशाने रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २२ लाख २५ हजार ५१५ वर पोहोचली. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६४२ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. ३ कोटी १४ लाख ११ हजार ९२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला ३ लाख ८१ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत.