लीला गांधी या अभिनेत्री आणि नृत्यांगनेनं आज सत्तरी ओलांडलेली असली तरी त्यांच्या देखणेपणात तसूभरही कमतरता आलेली नाही. आजच्या काळातसुद्धा बोलताना, वागताना, वावरताना त्या तशाच ताज्या टवटवीत दिसतात. त्या केवळ मलाच नव्हे, तर साऱ्या मराठी प्रेक्षकांना आजही प्रचंड आवडताना दिसतात. म्हणूनच या लेखाच्या शीर्षकात म्हटलं “नृत्यांगना लीला गांधी ः सर्व प्रेक्षकांची लाडकी.’ केवळ नर्तिका म्हणून नव्हे, तर नृत्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या आणि तरीही ग्रामीण बाजाची एक उत्तम अभिनेत्री नृत्यांगना म्हणून त्यांचा असणारा दबदबा आजही कायम आहे. एक माणूस म्हणूनही ही कलावती खूप मोठी आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना खूप मानणाऱ्या अशा या लीला गांधी आहेत. त्यांच्याबरोबर एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात भूमिका करण्याचा मला कधी योग आला नाही, तशी संधी मिळाली नाही; परंतु त्यांचे अनेक चित्रपट, “लीला गांधी नृत्यदर्शन- हे त्यांचे नृत्याचे कार्यक्रम बघता बघता आमची पिढी मोठी झाली हे कधी विसरता येणार नाही. ही बाई कलावती आणि माणूस म्हणून मोठीच आहे.
लीला गांधी आणि माझी पहिल्यांदा प्रत्यक्ष गाठ पडली ती त्यांची दूरदर्शनसाठी मी मुलाखत घ्यावी असं ठरलं त्यावेळी. मुंबई दूरदर्शनच्या एक निर्मात्या डॉ. किरण चित्रे त्या काळात “चेहरे-मुखवटे’ या नावाचा कार्यक्रम करीत असत. त्या कार्यक्रमांत ही मुलाखत होणार होती. लीला गांधी त्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सुलोचनाबाई यांच्या घरी उतरल्या होत्या. सुलोचनाबाई यांच्या घरीच त्यांची कन्या श्रीमती कांचन घाणेकर निवासाला होत्या. सुलोचनाबाईंचं घर मुंबईत प्रभादेवीला सिद्धीविनायक मंदिराजवळ होतं. वेळ ठरवून मी त्यांना म्हणजे लीला गांधींना भेटायला सुलोचनाबाईंच्या घरी पोहोचलो. लीला गांधी पुण्यातच राहात असत. (आजही त्या पुण्यातच राहतात.) त्या केवळ या मुलाखतीसाठी मुंबईला येऊन सुलोचनाबाईंच्याकडे थांबल्या होत्या. मी त्यांना त्यावेळी प्रथम आणि प्रत्यक्ष असं बघत होतो. चित्रपट नाटकात बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं वेगळं.
साधी पाचवारी घरातलीच साडी परिधान केलेल्या परंतु तेजपुंज चेहऱ्याच्या लीला गांधी बघून मला खूप बरं वाटलं आणि हीच तमाशा चित्रपटात दिसणारी कलावती प्रत्यक्षातही एवढ्या मोहक बोलक्या चेहऱ्याची तर आहेच पण त्याचबरोबर आज ती पुण्यातली एक मान्यवर कॉसमॉस बॅंक. या बॅंकेची निवडून आलेली एक संचालक आहे. या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान वाटला. मला लीला गांधी भावल्या त्या यासाठी. त्यांच्या कारकिर्दीचा उंचावत जाणारा ग्राफ आणि “कॉसमॉस’ सारख्या सुशिक्षितांच्या बॅंकेवर संचालक म्हणून निवडून येण्याच्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मला आणि माझ्यासारख्या अनेकांना आजही अभिमान वाटतो. त्यामुळं दूरदर्शनसाठी त्यांची मी घेतलेली मुलाखत खूप चांगली झाली आणि ती अनेकांना आवडल्याची असंख्य पत्रं दूरदर्शनच्या “सप्रेम नमस्कार’ या कार्यक्रमासाठी आली.
मलाही बर वाटलं. कारण सुलोचनाबाईंच्या घरी लीलाबाईंशी बोलताना “मला हे मुलाखत देणं वगैरे जमणार नाही’ असं म्हणणाऱ्या लीलाबाईंनी अप्रतिम आणि सडेतोड मुलाखत दिली होती. ती छानही झाली होती. मला वाटलं होतं की ती मुलाखत प्रक्षेपित झाल्यानंतर लीला गांधींचा मला, नाहीतर निदान डॉ. किरण चित्रे या त्या कार्यक्रमाच्या निर्मातीला तरी फोन येईल. पण तसं काही घडलं नाही. स्वतः लीला गांधी मुलाखतीनंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात एक दोन वेळा भेटल्या पण त्यांनी जणू ओळखच नसल्याचं भासवलं. काहीतरी कारणानं त्या रागावल्या असाव्यात असं वाटलं. मला वाईट वाटलं.
पुढं काही काळानंतर खुलासा मिळाला. गैरसमजुतीनं सारा प्रकार घडला हे लक्षात आले. काही काळानंतर विविध क्षेत्रातल्या काही महिला-विदुषींच्या कार्यकर्तृत्वावर आधारित माझं “इंदिरा गांधी ते लीला गांधी’ या नावाचं एक पुस्तक मान्यवर साहित्यिक आणि “मृत्युंजय’कार म्हणून अजरामर झालेले लेखक शिवाजी सावंत यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्या प्रकाशन सोहळ्यात खुद्द सावंतांनीच “लीला गांधींना विश्वासरावांनी’ “इंदिरा गांधी ते लीला गांधी’ या पुस्तकात खूप मोठं केलं आहे. या पुस्तकाचं शीर्षकच त्यांनी “इंदिरा गांधी ते लीला गांधी’ असं दिल्यानं आणि या पुस्तकात अनेक मान्यवर विदुषींबरोबर नृत्यांगना लीला गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतल्यामुळं त्या खूप मोठ्या झाल्या आहेत.” असे उद्गार काढले. ते कदाचित त्यांच्या (म्हणजे लीला गांधींच्या) कानावर गेले आणि बराच काळ राहिलेला त्यांचा राग शांत झाला असावा.
पुढं ज्येष्ठ नागरिकांच्या एका कार्यक्रमातही असंच घडलं. “आज आपल्या इथं इंदिरा गांधी आल्या आहेत’ असं प्रास्ताविकात सांगितलं गेलं. पण प्रत्यक्षात त्या कार्यक्रमात लीला गांधीच आलेल्या होत्या. त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. त्या कार्यक्रमात मी लीला गांधींना मुद्दाम भेटलो आणि त्यांचा गैरसमज दूर करताना त्यांना प्रश्न विचारला की, “तुमची मुलाखत घेताना, तुम्हीच त्या कार्यक्रमाच्या नायिका असताना, मी तुमचा अपमान होईल असं का वागेन’ त्यावर त्या खुद्कन हसल्या आणि गैरसमज दूर झाला. परंतु, मधली तथाकथित “हितचिंतक’ “हितशत्रू’ मंडळी काही ना काही तरी करून “पेटवीत’ असतात त्यांनी “मिरवायला’ शिकलं पाहिजे उगाच गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. असं मला या निमित्तानं सुचवावसं वाटलं, वाटतं.
हे सारं आज या “साठवण’ सदराच्या लेखनाच्या निमित्तानं सांगावंसं वाटलं किंवा तसं सांगण्याची या सदरानं संधी उपलब्ध झाली. गैरसमज पसरवणाऱ्या संबंधितांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कलावंत- मग तो कुठल्याही प्रांतातला का असेना- खूप संवेदनशील असतो. त्याच्या मनात पटकन एखादा गैरसमज होणारा रसभरीत किस्सा घट्टपणानं बसवता येतो. पण त्यामुळं अचानक गैरसमज होतात आणि ते एकमेकांच्या संबंधात बिघाडसुद्दा करू शकतात. काय सांगायचं यापेक्षा काय नाही सांगायचं हे नेहमी ठरवायला हवं.
आज सुदैवानं माझे आणि लीला गांधी यांचे संबंध उत्तम प्रकारचे आहेत. पण ज्या मंडळींनी ते बिघडवण्याचा प्रयत्न त्या काळात भले नकळत का होईना, केला असेल त्यांनी काय साध्य केलं ते मला कळत नाही. पण असं कुणी चुकून किंवा नकळत सुद्धा करू नये एवढीच विनंती मला या निमित्ताने करावीशी वाटते. इतर अन्य क्षेत्रात जशी काही विघ्नसंतोषी माणसं असतात त्याचप्रमाणं नटराजाचा वरदहस्त लाभलेल्या कला आणि संस्कृतीच्या याही क्षेत्रात अशी काही माणसं असतात. काड्या घालण्याचंच काम ती मंडळी करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी शक्य झालं, तर त्या मंडळींची ती विधायक नव्हे, तर विध्वंसक वृत्ती वेळीच ठेचून टाकली पाहिजे. आणि हे सारं कथन करताना काही वाटत नाही पण त्या काळात या गोष्टीचा खूप म्हणजे खूपच मनःस्ताप झालेला आहे हे नमूद करावंसं वाटतं. असो.
तर अशा या लीला गांधींनी अनेक रंगमंचीय कार्यक्रम, वगनाट्य-लोकनाट्य आणि चित्रपटांत नृत्यप्रधान भूमिका साकारून आपलं अभिनय आणि नृत्य कौशल्य सिद्ध केलेलं आहे. “सांगत्ये ऐका’, “देवा तुझी सोन्याची जेजुरी’, “सर्वसाक्षी’ असे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यानं गाजलेले आहेत. वगनाट्य-लोकनाट्य, तमाशाप्रधान आणि लावणीवर आधारित अनेक रंगमंचीय कार्यक्रम त्याचप्रमाणं मुलाखतींचे कार्यक्रम करून त्यांनी मराठी रसिकांना खूश केलेलं आहे. चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने यांनी लीलाबाईंच्यावर “केला इशारा जाता जाता’ आणि “सांगत्ये ऐका’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांमधली अतिशय सुंदर म्हणून ओळखली गेलेली लावणी- नृत्यं दिग्दर्शित करण्याची जबाबदारी सोपवली होती.
त्याचबरोबर कै. मास्टर भगवान यांनी लीलाबाईंची नृत्यकला बघितली आणि त्यांना त्यांच्या “रंगीला’ या चित्रपटात (हिंदी) ब्रेक दिला होता. त्या वयाच्या 8व्या वर्षांपासूनच अतिशय शास्त्रशुद्ध असं नृत्याचे प्रशिक्षण घेत असत. त्या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांच्या 8व्या वर्षी अहमदनगर हे गाव कसं असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. त्यात वडिलांचं कापडाचं दुकान. घरी नृत्य-गायन इत्यादीची परंपरा नाही. त्यात त्या पुण्यात स्थिरावल्या आणि त्यांनी ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करणारे श्री. रोंघे यांच्याबरोबर संसार केला. त्यांना तीन विवाहित कन्या आहेत.
अनेक पारितोषिकं आणि पुरस्कार मिळवलेल्या या अभिनेत्रीचे “पहिला भाऊ’, “बंदीवान मी या संसारी’, “भिंगरी’, “मानाचं कुंकू’, “शुभमंगल सावधान’, “साता जन्माचा सोबती’, “बुगडी माझी सांडली गं’, असेही त्यांचे चित्रपट आहेत. या लीलाबाई आपल्याला प्रिय आहेत. कारण त्या फारशा कुणाच्या अध्यात-मध्यात नसतात. त्यांच्याबद्दल काही वेडंवाकडं कानावर येत नाही. लहान-मोठ्या कार्यक्रमांना त्या आवर्जून उपस्थित असतात. त्या तशा निगर्वी वाटतात. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाबाईंना मानणाऱ्या या अभिनेत्रीनं स्वतःचं असं एक वेगळं स्थान स्वतःच्या आदर्श वर्तनानं या क्षेत्रात निर्माण केलेलं आहे.
मला त्यांचं खूप कौतुक वाटतं ते यासाठी की “लावणीसम्राज्ञी’ म्हणवणारी ही मान्यवर कलावती, कलाप्रांताबरोबच बॅंकिंग व्यवसायात एक संचालिका म्हणून वावरली आणि “नाटक-चित्रपटाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना काय सल्ला द्याल’ यावर त्या दोन्ही हाताचे तळवे आपल्या समोर धरत मोठ्या विश्वासानं सांगतात की, “आपण आपल्याला जपलं पाहिजे. कुणी जर अतीच करायला लागला, तर गोड बोलून, दादा-बाबा करून त्याच्या वागण्याला वेसण घातली पाहिजे. या त्यांच्या विचारांमुळेच लेखाच्या शीर्षकात म्हटलं “नृत्यांगना लीला गाधी : प्रेक्षकांची लाडकी!
डॉ. विश्वास मेहेंदळे