मुबलक पाण्यामुळे यंदा उन्हाळा जाणार सुसह्य
रांजणी -पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे ओसांडून वाहिली. 2019 च्या शेवटच्या टप्प्यातही चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा आहे. 20 जानेवारीअखेर जिल्ह्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा
यंदाच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला. जानेवारी महिन्यात शेतीसाठी आवर्तने सोडण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी याच काळात जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याची आवर्तनेही शेतीसाठी सोडता आली नाही. परंतू यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेती सिंचनासाठी मुबलक पाणी देता येवू शकते.
जिल्ह्यातील धरणांचा विचार करता गेल्या वर्षी धरणांमध्ये कमालीचा कमी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वच ठिकाणी पाणीटंचाई भासली. पाण्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये वातावरण तापले गेले. पाण्यावरुन शेतकऱ्यांमध्येही अंतर्गत वादविवाद निर्माण झाले. अधिकाऱ्यांना तर तारेवरची कसरत करावी लागली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणातही चांगलाच पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्व 25 धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता 216. 84 टीएमसी आहे. 2018 मधील तीव्र दुष्काळामुळे धरणातील पाणीसाठा खूपच खालावला होता. त्यामुळे गेल्या वर्षी फेब्रुवारी ते जून दरम्यान पाण्याची खूपच कमतरता भासली. उजनीसह अनेक धरणे अचल पातळीत गेली होती.
परंतू 2019 च्या ऑगस्ट – सप्टेबर महिन्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला. धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नसल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. दरम्यान 2018 आणि 2019 सालामध्ये जिल्ह्यातील धरणांमध्ये यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेती सिंचनाला मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा भासला आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले होते.