आमदार ऍड. कुल : सहा हजार हेक्टर शेतीचे नुकसान, उर्वरित भागांसाठी पाठपुरावा करणार
दौंड (प्रतिनिधी) – दौंड तालुक्यातील सुमारे 4 हजार 873 हेक्टर क्षेत्रातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण झाले असून, तालुक्यातील एकूण 6 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाकडे पाठपुरवा सुरू असल्याची माहिती दौंडचे आमदार ऍड. राहुल कुल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की पुण्याचे अतिरिक्त जिल्हा अधिकारी साहेबराव गायकवाड आणि निवासी उपजिल्हा अधिकारी जयश्री कटारे यांची 2 नोव्हेंबरला आमदार ऍड. कुल यांनी भेट घेऊन निवेदन दिले होते.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून, दौंड तालुक्यातही मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, शेतकऱ्यांची चालू हंगामातील पिके गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे या पिकांचे आणि शेतीचे तात्काळ पंचमाने करून नुकसान भरपाई मिळणेबाबत प्रशासानाने कार्यवाही करावी, असे आमदार ऍड. कुल यांनी निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच दौंड आणि पुरंदरचे प्रांत प्रमोद गायकवाड आणि तहसीलदार संजय पाटील यांच्याशी देखील आमदार कुल यांनी संपर्क करून याबाबत सूचना दिल्या आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे पंचनामे करणे बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालय, गाव कामगार तलाठी व कृषी अधिकरी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आमदार ऍड. कुल यांनी केले आहे. त्यामध्ये काही अडचणी असल्यास आमदार कुल यांच्या कार्यालयाशी संपर्क करण्याची विनंती त्यांनी बाधित शेतकऱ्यांना केली आहे.
पंचनामे पूर्ण झालेला भाग
4873 हेक्टर क्षेत्रातील बाजरी पिकाचे सुमारे 841.40 हेक्टर, ज्वारी सुमारे 295 हेक्टर, सोयाबीन सुमारे 26.70 हेक्टर भाजीपाला सुमारे 2450 हेक्टर, फळपिके सुमारे 1260 हेक्टर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
त्वरित पंचनाम्याचे आदेश
दौंड तालुक्यातील लिंगाळी, कुरकुंभ, बोरिबेल, गाडेवाडी, पडवी, देऊळगावगाडा या ठिकाणी तहसीलदार संजय पाटील यांनी भेट दिली होती. संपूर्ण तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश गाव कामगार तलाठी व कृषी अधिकरी यांना तहसीलदार संजय पाटील यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील एकूण 6000 हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे.