गोंदवले – माण तालुक्यात यावर्षी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी दुपटीहून अधिक म्हणजे 750 मिमी वा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अंदाजे 2000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान होईल, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, 2452 हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद 5 नोव्हेंबरअखेर झाली असून या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.
नुकसान झालेले क्षेत्र 3000 हेक्टरच्या वर जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 6 नोव्हेंबरपर्यत पंचनामे करून अहवाल पाठविण्यास शासनाने सांगितले असले तरी उर्वरित पंचनामे होण्यासाठी ही मुदत वाढवावी अन्यथा अनेक बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शासनाचे आदेश मिळाल्यावर कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांनी तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात कैली. रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, मका, डाळींब, द्राक्षे यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. 5 नोव्हेंबरअखेर 5372 शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले आहेत. अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही रस्ते खचले आहेत तर काही रस्ते व पूल वाहून गेल्याने पंचनामे करताना अडथळे येत आहेत.
प्रांतधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी गोरखनाथ शेलार, तालुका कृषी अधिकारी पवार यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. पंचनाम्यांचे काम समन्वयाने काम सुरू असून शेतकऱ्यांची तक्रार आल्यास तातडीने दखल घेतली जात आहे. 6 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यत पंचनामे सुरू होते. अनेक ठिकाणी मोबाईल सेवा विस्कळीत असल्याने याबाबतचा पुरेसा तपशील मिळू शकला नाही. माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रथमच नुकसान झाले असून त्याची सर्वाधिक झळ दहिवडी, बिदाल, मलवडी परिसराला बसली आहे.