निमसाखर येथे हर्षवर्धन पाटील यांची टीका
निमसाखर -आमदारांच्या पोरकटपणामुळे पाण्याच्या सिंचनाबाबतीत तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा नदीला गेली 5 वर्षांत पाणी सोडता आले नाही. तालुक्यात सध्याही अल्प पाऊस असून अजुनही तालुक्यात 63 टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कधी नव्हे अशा भागातही जनावरांना चारा छावणीमध्ये आश्रय घ्यावा लागत असल्याची खंत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
निमसाखर (ता. इंदापूर) येथे पाटील एका खासगी भेटीसाठी आले होते. यावेळी नीरेच्या पाणीप्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील नीरेच्या बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदाने काही टप्प्यांपर्यंत बसवावेत. जलसंपदा खात्याला शेतकऱ्यांकरिता ढापे बसवण्यासाठी नीरा भीमाकडून मनुष्यबळाबरोबरच आर्थिकही मदत करण्यास तयार आहे. इंदापूरच्या हद्दीत असणाऱ्या 4 ते 5 टप्प्यांपर्यंत लोखंडी ढापे बसवावेत. यामुळे चारा व पिण्याचा काहीअंशी प्रश्न मिटेल.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती जयकुमार कारंडे, निमसाखरचे उपसरपंच पांडुरंग पानसरे, माजी सरपंच गोंविद रणवरे, माजी उपसरपंच अनिल बोंद्रे, माजी सदस्य अनिल रणवरे, रत्नप्रभा पेट्रीलीयचे हर्षवर्धन रणवरे, चंद्रकांत रणवरे उपस्थित होते.