पुणे (प्रभात वृत्तसेवा) – भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील मैदानाच्या हिरवळीवर माती टाकून कबड्डी स्पर्धा भरवण्यास महापालिकेने परवानगी दिल्याने मैदानाचे नुकसान होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिका उपायुक्तांकडे पत्राद्वारे केला आहे.
महापालिकेच्या अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे 29 मे ते 1 जून या कालावधीमध्ये आमदार चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी स्टेडियमला लागूनच महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले प्रशालेचे मातीचे मैदान उपलब्ध असताना देखील आयोजकांनी राजकीय कुरघोडी पोटी स्टेडियमच्या चांगल्या मैदानाचे नुकसान केल्याचे बागवे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील लॉन लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आले आहे. परंतु या लॉन्सवरती या स्पर्धेसाठी माती टाकून कबड्डीचे ग्राउंड बनवण्यात आले आहे. इतक्या चांगल्या स्टेडियममधील लॉनची माती टाकून दुरावस्था करण्यामागे आयोजकांचा हेतू काय आहे, हा प्रश्न स्टेडियमवर येणाऱ्या खेळाडू व नागरिकांना पडला आहे.
या स्टेडियमवर विविध क्रीडा संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने नेहमी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. परंतु अशा पद्धतीने मैदानाची नासधूस आणि दुर्दशा यापूर्वी कोणीही केली नव्हती, असे बागवे यांनी म्हटले आहे. या मैदानावर लॉनवर माती टाकल्याने आणि मंडप उभारल्याने नियमित व्यायामासाठी व सरावासाठी येणाऱ्या नागरिकांची व खेळाडूंची गैरसोय झाली आहे.
स्पर्धा संपताच हे मैदान पुन्हा पूर्वीसारखे लॉन तातडीने करून द्यावे, अशी मागणी बागवे यांनी क्रीडा विभागाचे उपायुक्त यांच्याकडे केली आहे.