लोणी काळभोर -दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून घराच्या दरवाजा व खिडकीवर कोयते मारून, एका चारचाकीसह चार दुचाकी गाड्यांचे नुकसान केल्याबद्दल 52 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भास्कर देविदास झांबरे यांनी उरुळी दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे. यावरून आकाश ऊर्फ मनोज मारुती झांबरे, कुमार मारुती झांबरे (दोघे रा. होळकरवाडी ता.हवेली ) व त्यांचे इतर 40 ते 50 अनोळखी साथीदारांविरोधात उरुळी कांचन दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.26 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास भास्कर व त्याचा चुलतभाऊ संजय झांबरे यांची आकाश व कुमार यांच्याशी किरकोळ भांडणे झाली होती. त्यानंतर मनोज याने फिर्यादीचा सख्खा भाऊ विश्वास यास फोन करून शिवीगाळ केली होती. त्यानंतर किरकोळ बाचाबाची झाली होती.
28 जुलै रोजी रात्री 8 वाजता भास्कर कुटुंबासोबत घरी असताना त्यांना घराच्या बाहेर फायरिंगसारखा आवाज आला म्हणून त्यांनी बाहेर पाहिले असता, घराच्या समोर आकाश व कुमार झांबरे तसेच त्यांच्या सोबत 40 ते 50 लोक होते. ते लोक भास्कर यांचे घराकडे पाहून शिव्या देत होते. दरवाजा लावल्याने त्या लोकांना घरात येता आले नाही. म्हणून त्यांनी घराचा दरवाजा व खिडकीवर कोयते मारले. त्यानंतर पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांवर दगड तसेच कोयते, तलवारी मारण्यास सुरुवात केली.
यावेळी खिडकीची काच फुटून उडून फिर्यादी भास्कर त्यांची वहिनी रूपाली, आई अरुणा व पत्नी काजल यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत. तसेच पार्किंगमधील त्यांची चारचाकी तसेच दुचाकी गाड्यांवर दगड, कोयते व तलवारी मारून नुकसान केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी उरुळी कांचन दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे.