पंचनामे करून अतिक्रमणे काढणार ः हवेली तहसीलदारांची माहिती
लोणी काळभोर-ओढे व नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित गावच्या तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती संकलित झाल्यानंतर ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते काढण्यासाठी नोटीसीद्वारे मुदत देण्यात येणार आहे. विहीत मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ते महसूल यंत्रणेद्वारे हटवले जाईल. याचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली.
पूर्व हवेलीतील काही शेतकरी व विकसकांनी शासकीय ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने येथील शेतातील पिकांचे व लगतच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के आले होते. त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, विस्तार अधिकारी निकेतन धापटे, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, हेमलता बडेकर, मंडल अधिकारी गौरी तेलंग, तलाठी दादासाहेब झंजे (लोणी काळभोर), दिलीप पलांडे (थेऊर), योगिराज कनिचे (आळंदी म्हातोबाची), डी. डी. शेख (कोलवडी), मिलिंद शेट्टी (मांजरी) हे होते.
नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने ओढे नाल्यांना पूर आला; मात्र ओढे नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आणल्यामुळे हे मानवनिर्मित संकट ओढवले आहे. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी थेट घरात व लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले.
यामुळे शेतीची वाताहात झाली आहे. अतिक्रमणामुळे ओढे, नाले यांचा नैसर्गिक प्रवाह काही ठिकाणी बदलण्याचा प्रकार झाला असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाला आहे. याची पाहणी करण्यासाठी वरील पथक आले होते. त्यांनी लोणी काळभोर येथील तरवडी – रानमळा, पाटील वस्ती, थेऊर येथील काकडेमळा, गाढवेमळा, आळंदी म्हातोबाची येथील पानमळा, भोंडवेवस्ती, रामवाडी व कुंजीरवाडी येथील धुमाळ मळा आदी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली व पाहणी केली. येथील शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी यापुढील काळात पुन्हा हे संकट ओढावू नये म्हणून ओढे, नाले यांवर झालेले अतिक्रमण हटवून ते पूर्ववत करावेत, अशी आग्रही मागणी सर्वांनी केली.
- शासन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसांत आयोजित करून यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल. तलाठ्यांनी पंचनामे केल्यानंतर अतिक्रमण झालेले ओढे-नाले मोकळे करण्यात येतील. काही ठिकाणी अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी सर्वांना विचारांत घेऊन मार्ग काढण्यात येईल.
-हेमलता काळोखे, सभापती हवेली पंचायत समिती