मावळ – तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. या आस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतीमालाबरोबरच वीटभट्ट्यांचेही नुकसान
मावळ तालुक्यात सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गहु, बटाटा, घेवडा या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हाता-तोंडांशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला. पवन मावळामध्ये वीट कारखानदार मोठ्या प्रमाणावर असल्याने वीटभट्टीवाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके वाऱ्यामुळे व पावसामुळे आडवी झाली. टोमॅटोच्या सऱ्या पाण्याने तुडुंब भरल्या होत्या. शेतकऱ्यांनी टोमॅटो बांधणी केली होती. पावसामुळे शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पवनानगर परिसरात पावसाने दुसऱ्या दिवशीही सकाळीच हजेरी लावली. परिसरातील झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
कान्हे परिसरात आंब्याचा मोहर गळून पडला
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले. गेल्या 15 दिवसांत आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर आला होता. मात्र या पावसामुळे सर्व मोहर गळून गेला. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानाच्या आडोसा शोधला.
कामशेतमधील सखोल भागात पाणी
सोमवारी संध्याकाळी कामशेत परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान एकतास पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे कामशेत परिसरातील सखल भागात पाणी साचले अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.