कराड – कराड बाजार पेठेतील अतिक्रमण मोहिमेला विरोध दर्शवत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी व्यापारी, पोलीस व नगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी ही मोहीम अन्यायकारक असल्याचे सांगून नुकसानीचे पंचनामे करा, तरच दुकाने उघडू असा पवित्रा घेतला. यावर अतिक्रमण मोहीम थांबणार नाही. शहर आणि नागरिकांच्या हितासाठी ती राबवलीच जाईल, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली.
कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, विजय गोडसे, अमित बाबर, जयश्री पाटील, उपनिरीक्षक ए. एल. शिरोळे, मोहन तलवार तसेच व्यापारी उपस्थित होते.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे कांतीलाल ओसवाल, बाबुशेठ लुणिया, नितीन ओसवाल, रमेश मोहिते यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अतिक्रमण मोहीम ही अन्यायकारक आहे. कोणतीही पूर्व कल्पना न देता दुकानावरील बोर्ड, दुकानासमोरील पायऱ्या, बांधकामे हटविण्यात येत आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पालिकेचे कर्मचारी आकसाने अतिक्रमणे हटवित आहेत. तीन दिवसात व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
अतिक्रमण मोहीम राबवताना दुजाभाव केला जात आहे. अनेकांचे बोर्ड अद्याप तसेच आहेत. बस स्थानकासमोरील अतिक्रमणे निघाली, मग अलंकार हॉटेलचे अतिक्रमण का निघाले नाही? याचा खुलासा करावा. तर काहींनी नगरसेवकांसह काहींच्या घरांची अनधिकृत बांधकामे आहेत ती कधी काढणार? असा सवाल उपस्थित केला.
जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे होत नाहीत व भरपाईबाबत खुलासा होत नाही, तोपर्यंत आम्ही दुकाने उघडणार नाही, असा पवित्रा व्यापारी वर्गाने घेतला आहे. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, शहरातील अतिक्रमणे निघावीत, अशी नागरिकांची मागणी होती. अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यापासून वर्षानुवर्षांची अतिक्रमणे निघाली आहेत. शहरातील रस्ते मोकळे व प्रशस्त दिसू लागले आहेत. नागरिक फोन करून या मोहितेचे स्वागत करत आहेत. ही मोहीम सुरूच राहणार आहे. पुढील टप्प्यात अनाधिकृत रिक्षाथांबे हटविण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांनी कोणतीही वेगळी भूमिका न घेता शहराच्या हिताचा विचार करून मोहिमेला सहकार्य करावे.
सुरज गुरव म्हणाले, अतिक्रमण मोहीम अत्यंत पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आली आहे. याबाबत कोणीही मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही. नागरिकांच्या हितासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ, सुंदर शहराची जबाबदारी व्यापारी वर्गाचीही आहे.
बी. आर. पाटील म्हणाले, सामोपचाराने प्रश्न सोडवावेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये. मोर्चे हे लोकशाही मार्गाच्या आंदोलनाचा भाग असलातरी त्याच्या आडून कोणीतरी गैरप्रकार करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतो.
यावेळी व्यापाऱ्यांची सात जणांची कमिटी स्थापन करून समन्वयांतून बाजार पेठेतील अतिक्रमणे काढण्याचे निश्चित करण्यात आले.