पावसामुळे कणसे आणि वैरण भिजली : ठिकठिकाणी विद्युत पुरवठा खंडित
अवसरी – आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतातील कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
मंचर, अवसरी खुर्द, कळंब, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, गावडेवाडी परिसरात रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सायंकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साठले होते. शेतकऱ्यांची उन्हाळी बाजरी काढणी, कापणी तसेच मळणीची कामे बाकी आहेत. त्यात अचानक आलेल्या पावसाने शेतातील बाजरी पीक भिजून गेले आहे. जनावरांसाठी ठेवलेली कणसे आणि वैरण भिजली आहे. काही भागात कणसासहित बाजरी खाली पाणी साठलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वैराण आणि धान्यांची प्रत घसरणार असल्याने त्याला बाजारात भाव कमी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.