कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शुक्रवारी (दि.24) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे उपस्थित होते.
तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर, सुरेगाव, वेळापूर, माहेगाव देशमुख व मढी बु. शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी आदी उभ्या पिकांचे नुकसान झाले. साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्यामुळे कांद्याचेही नुकसान झाले. मढी बु. येथे आदिवासी वसाहत, सुरेगाव येथे झोपडी परिसर, अंबिकानगरमधील किराणा दुकान, मेडिकलमध्ये, शहाजापूर येथील नागरी वसाहतीमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांचे संसारोपयोगी साहित्य भिजले होते.
या नुकसानीची आ. काळे यांनी पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
यावेळी गौतम सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे, वाल्मीक कोळपे, मढी खु.चे सरपंच बापूसाहेब गवळी, उपसरपंच अण्णासाहेब गवळी, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, गावचे पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.