कृष्णा खोऱ्यातील धरणांवर बसवली अत्याधुनिक यंत्रणा
पुणे – मागील वर्षीचा पूर लक्षात घेता यंदा धरणांमधून पाणी सोडण्याचे नियोजन अचूक व्हावे, यासाठी धरणांवर “रियल डेटा कलेक्शन सिस्टिम ऍन्ड फ्लड फोरकास्ट आणि रियल टाइम डिस्चार्ज सपोर्ट सिस्टिम’ ही यंत्रणा कृष्णा खोऱ्यातील धरणांवर बसविण्यात आली आहे. देशात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. यामुळे धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
मागील वर्षी कृष्णा खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यात धरणातून विसर्गामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूर आला. आठवडाभर पुराचे पाणी ओसरू शकले नव्हते. अतिवृष्टी हे जसे एक कारण यामागे असल्याचे सांगितले जाते, तसे धरणातून पाणी सोडण्यासंदर्भातील योग्य नियोजन न झाल्यामुळे देखील त्याचा फटका बसल्याचे निदर्शनास आले होते. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणि सांगली व कोल्हापूर येथील पूरस्थितीतीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक समितीदेखील नियुक्त केली होती.
या समितीने नुकताच आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. त्यामध्ये देखील या दोन्ही सिस्टिम धरणांवर बसवल्याचे नमूद केले आहे. 2014 मध्ये ही योजना हाती घेण्यात आली. त्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत कृष्णा खोऱ्यातील धरणावर ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते. गेल्या वर्षी या दोन्ही सिस्टिमची टेस्ट घेण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यातील डेटा कलेक्शन सिस्टिम पूर्णपणे कार्यन्वित करता आली नव्हती. मात्र, मागील वर्षभरात ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
कृष्णा खोऱ्यातील धरणांवर संबंधित यंत्रणा बसवण्याचा “पायलट प्रोजेक्ट’ राबवण्यात आला. आता तो राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिस्टिममुळे पुराचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
– राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग