पुणे – जून संपत आला, तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्राला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शहर तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांना दिलासा मिळाला असून हे उपलब्ध पाणी पुढील तीन महिने पुरेल एवढे असल्याने पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पुणे शहरासह जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि सिंचनासाठी पाणी वापरले जाते. सुमारे 29.50 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणांतून पुणे शहरासाठी महिन्याला दीड टीएमसी पाणी दिले जाते. तर उर्वरित पाणी सिंचन तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी वापरले जाते.
या चारही धरणांत मागीलवर्षी सुमारे 2.29 टीएमसी पाणीसाठा (7.85 टक्के) तर या वर्षी तब्बल 5.47 (18 टक्के) टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर, यावर्षी या चारही धरणांमध्ये मान्सून दाखल झाल्यापासून तुरळक पाऊस सुरू असला, तरी अद्याप पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होईल, एवढ्या पावसाने जोर धरलेला नाही.
विसर्ग सुरूच
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चारही धरणांमध्ये 1 जूनपासून सर्वाधिक पाऊस टेमघर धरण क्षेत्रात सुमारे 517 मिमी, तर वरसगाव धरणात 347 मिमी, पानशेत धरणात 355 मिमी, तर खडकवासला धरणात 182 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून सध्या जिल्ह्यातील सिंचनासाठी मुठा उजव्या कालव्यातून 1103 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
29.50 टीएमसी धरणसाखळीची
उपयुक्त पाणीक्षमता