पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात मिळून एकूण पाणीसाठा 97.24 टक्के म्हणजे 28.34 टीएमसी झाला आहे.
खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे 100 टक्के भरली आहे, तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर असून, धरणात 82.94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
यामुळे यंदा पुणे शहरातील पिण्याचा आणि जिल्ह्यातील शेतीचा पाणी प्रश्न पूर्णत: मिटल्यात जमा आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून 5 हजार 136 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून धरण क्षेत्रात पावसाचे आगमन झाले. दमदार पाऊस झाल्याने धरणांची खालावलेली पाणीपातळीत वाढ झाली. पावसाची संततधार अशीच कायम राहिल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरू लागली. धरणात समाधानकारक पाणीसाठा होत असल्याने पाणीकपातीचे संकट दूर झाले.