185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड लंपास : पोलिसांकडून तपास सुरू
कोल्हापूर : बॅंक, मंदिर, घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. असे प्रकार घडल्यावर लगेचच पोलिसांना माहिती दिली जाते. मात्र, कोल्हापूरमध्ये चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
त्यामुळे पोलीस ठाणेच सुरक्षित नसेल, तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून तब्बल 185 मोबाईल चोरीला गेले आहेत. पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाईल हस्तगत केले होते.
त्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री उशिरा घडला. सध्या कोल्हापुरात सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महमद पटेल यांनी तक्रार दाखल केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे तपास करत आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कारकून स्टोअर रूममध्ये अज्ञाताने प्रवेश केला.
लोखंडी कपाटातून विविध गुन्हे व कारवाईत जप्त करण्यात आलेले 185 मोबाईल फोन लंपास केले. याशिवाय 7 लाखांची रोकडदेखील लांबवली. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. यासोबत ठसे तज्ज्ञांच्या मदतीने काही पुरावेदेखील गोळा करण्यात आले आहेत.