पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंभर नगरसेवक निवडून द्या, दररोज पाणीपुरवठ्यासह शहरातील सर्वच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही कधीही “स्टंटबाजी’ करत नाही. आमच्यामध्ये प्रश्न सोडविण्याची आणि शहराचा विकास करण्याची धमक असल्यामुळे नागरिकांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी, आम्ही त्यांच्या समस्या सोडवू आणि विकास करु, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादा बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांच्यासह तीनही विधानसभेचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, महापालिकेवर भाजपाची गेली पाच वर्षे सत्ता होती. या वर्षांत भाजपने काय केले. ते शहरवासियांना दररोज पाणीदेखील देऊ शकले नाहीत. टक्केवारी, भ्रष्टाचार यामध्येच या लोकांचा वेळ गेल्याने पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ज्या कामांमुळे शहराचा विकास होणार आहे, जनतेचे कल्याण होणार आहे, अशा कामांना भाजपच्या काळात महत्त्व न मिळता ज्या कामांमध्ये या लोकांचा इंट्रेस आहे, ज्यामध्ये त्यांना कमिशन मिळाले ती कामे केली.
भाजपवर टीका करताना पवार म्हणाले, नागरिकांनी कररुपाने जमा केलेल्या पैशांचा विनियोग विकासकामांसाठी होण्याची गरज होती मात्र तसे झालेले नाही. श्वान नसबंदीमध्ये साडेसहा कोटींचा भ्रष्टाचार हा वेगळाच प्रकार आहे. करोनाकाळात केलेल्या नसबंदीसाठी काय सोन्याची उपकरणे वापरली होती काय? आमच्या सत्ताकाळात शहराचा जो विकासाचा वेग होता त्याला गेल्या पाच वर्षांत खिळ बसली आहे. आपल्याला गेल्या पाच वर्षांत विकासाचा जो बॅकलॉग निर्माण झाला आहे, तो भरून काढावयाचा आहे. त्यामुळे आपली महापालिकेत सत्ता नसतानाही पालकमंत्री या नात्याने शहराच्या विकासाला गती देण्याचे काम हाती
घेण्यात आले आहे.
विरोधकांच्या चक्रव्युहात अडकू नका
सध्या देशात, राज्यात आणि शहरात विरोधकांच्या माध्यमातून जाती-धर्मामध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे. चुकीच्या गोष्टींना थारा न देता विरोधकांच्या चक्रात अडकू नका, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. विरोधकांकडून केवळ आश्वासने दिली जातात, लोकप्रिय घोषणा केल्या जातात. सत्ता आली की त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले जात नाही. आपण असे न करता जे होऊ शकते त्याचा आराखडा तयार करून शहर विकासाला एक नवी दिशा देण्याबाबत काम करायचे आहे. समोरच्यांनी जातीधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करावे मात्र घसरू नये, असे इशाराही पवार यांनी यावेळी दिला.