नगर – करोना संकटकाळात नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला. त्यातून बाहेर पडण्यासाठी समाजाने आंदोलन उभारले. त्यावेळी दैनिक प्रभातने आंदोलनास मोठे पाठबळ दिले. त्यानंतर आज सलून व्यावसायिकांसाठी पुन्हा राज्यस्तरावरील हेअरकट स्पर्धेचे आयोजन करुन सलून व्यावसायिक व संपूर्ण नाभिक समाजालाच नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. “प्रभात’चा हा उपक्रम कौतुकास पात्र असल्याची भूमिका आमदार अरुणकाका जगताप यांनी मांडली.
दैनिक प्रभातच्यावतीने आयोजित व अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेचे उद्घाटन करताना आज ते बोलत होते.
दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक सीए रवीकुमार इंडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे, उद्योजक अनिल वाबळे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत, ऍड. शिवजित डोके यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, “”करोनाच्या काळात सर्वांनाच अडीअडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर मात करत आम्ही निश्चितच समाजासाठी चांगले काम करत राहिलो. त्याचवेळी “दैनिक प्रभात’ परिवार देखिल संकट काळात नाभिक समाजासोबत राहिला. समाजाचे प्रश्न मांडत राहिला. दैनिक प्रभातने नाभिक समाजासाठी सुरू केलेल्या या उपक्रमास माझ्यासह सर्वांच्या कायम शुभेच्छा असतील.”
आमदार संग्राम जगताप यांनी शहरात विकासाची अनेक कामे केली. ती करताना नाभिक समाजासह सर्वांनाच बरोबर घेतले. जिल्ह्यात विकासासाठी सर्वत्र निधी देण्याचे काम मी केले, अशी भूमिकाही आमदार जगताप यांनी मांडली. दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी म्हणाले, “”दैनिक प्रभात सामान्यांचे वर्तमानपत्र आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभातने नेहमीच आग्रही भूमिका मांडली.
करोनाच्या काळातही सक्षमपणे सेवा देण्याचे काम नाभिक समाजाने केले. प्रभातने त्यास पाठबळ दिले. खरेतर “जो भीत नाही, तो नाभिक’ याच भूमिकेतून नागरिकांची काळजी घेण्याचे कामही नाभिक समाजाने केले. सेवा देण्याचे समाजाचे काम अविरतपणे सुरुच आहे. कोणताही जातीभेद न करता नाभिक समाज सर्वांनाच प्रामाणिकपणे सेवा देत आला आहे.” दिवंगत ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक वा. रा. कोठारी यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी हे वर्तमानपत्र चालविले. त्यांचाच वारसा समर्थपणे चालविण्याचे काम दैनिक प्रभातच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. नाभिक समाजात संघटीतपणा आहे. तसेच समाजात नम्रताही आहे.
समाजाचा हाच गुण समाजाला पुढे नेण्याचे काम करतो, अशी भूमिकाही सरव्यवस्थापक स्वामी यांनी मांडली. तसेच यापुढील काळातही समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका प्रभात घेईल, असे आश्वासन दिले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य विकास मदने यांनी समाजाच्या सर्वच उपक्रमांचा आढावा घेतला. आमदार संग्राम जगताप व अरुणकाका जगताप यांच्या माध्यमातूनच समाजाच्या सांस्कृतिक भवनासह अनेक प्रश्न सुटले आहेत. अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असून, समाजातील नागरिकांना मदत करत आहोत.
लॉकडाऊन काळात समाजाची अर्थिक घडी विस्कळीत झाली. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यास दैनिक प्रभातने नेहमी पाठबळ दिले, अशी भूमिका मदने यांनी मांडली. सरकारने करोनाची लस देताना सलून व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही मदने यांनी यावेळी केली. तसेच समाजाच्या विकासासाठी हुतात्मा वीर भाई कोतवाल सोसायटी उभारण्याचा मानस असल्याची घोषणा त्यांनी केली. पदाधिकारी नंदकुमार मोरे व शांतराम राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे यांनी प्रास्ताविक केले.
प्रभात परिवाराने नाभिक समाजासाठी राबविलेल्या व सलून व्यावसायिकांसाठी नव्या वर्षात आणलेल्या उपक्रमांची घोषणा केली. नाभिक समाज महामंडळाचे कार्यकर्ते सनी मर्दाने यांनी सूत्रसंचालन केले. अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ यांनी आभार मानले.