नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्धार कायम ठेवणारे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच 23 मे नंतर आज कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित केले. लोकसभेतील कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांना उद्देशून ते म्हणाले की आपण आज संख्येने 52 असलो तरी आपण भाजपला पुरेसे आहोत. आपण भाजपच्या विरोधात आता रोज लढा दिला पाहिजे. प्रत्येकाने इंचइंच जागा लढवली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की नवनिर्वाचित खासदारांनी आपण नेमके कोण आहोत हे ओळखले पाहिजे.
आपण प्रत्येक भारतीयाची लढाई संसदेत लढणार आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. तुमचा लढा राग, द्वेष आणि घाबरटपणाशी आहे हे लक्षात ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. आता आपल्याला अधिक आक्रमक व्हावे लागेल असे ते म्हणाले. ते म्हणाले की आज पक्षाचे जुने नेते येथे आहेत त्यांच्याबद्दल मला आनंद आहे. ते तात्वीकदृष्ट्या आपल्या बरोबर आहेत. तथापी आता पक्षाला नवे रूप द्यायचे आहे. आणि आपण ते निश्चीतपणे करू असे ते म्हणाले.
सोनियांनी केले राहुल यांचे कौतुक
यावेळी संसदीय नेतेपदी पुन्हा निवड झाल्यानंतर बोलताना सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. राहुल गांधी हे दुरदर्शी नेते आहेत असेही त्यांनी नमूद केले. पक्षाच्या विजयासाठी राहुल यांनी दिवसरात्र मेहनत घेतली सर्वच पातळ्यांवरून त्यांनी पक्षाची संघटना व्यवस्थीत कार्यरत ठेवली होती असे त्या म्हणाल्या. त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी अपेक्षाही सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्याचे सर्वाधिकार यावेळी सोनिया गांधी यांना देण्यात आले.