मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी 6 आरोपींना जामीन नाकारला
जामीन अर्जावर 17 जूनला होणार सुनावणी
मुंबई – भायखळा महिला कारागृहात मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तुरूंग अधिकारी मनिषा पोखरणकर यांच्यासह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपीना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. खटल्याला विलंब होत असेल जर आम्ही दॅनदिन सुनावणी घेण्याचे आदेश देऊ. जामीन अर्ज मागे घ्या, असे निर्देश न्या. अजय गडकरी यांनी अर्जदारांना दिले आणि अर्जाची सुनावणी 17 जून पर्यंत तहकूब ठेवली.
भायखळा महिला कारागृहातील वार्डन मंजुळा शेट्ये हिला किरकोळ कारणावरून तुरुंगातील सहा महिला अधिकाऱ्यांनी अमानूष मारहाण केली होती. त्यात तिचा कारागृहातच 24 जूनला मृत्यू झाला होता. सुरूवातीला या प्रकरणाची वाच्चता
करण्यात आली नाही. परंतू कारागृहातील कैद्यांनी आवाज उठविल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने फटकारल्यानें मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाची दखल घेतली गेली. दोन दिवसानंतर हे प्रकरण पोलीस क्राईम ब्रॅंचकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी तुरूंग अधिकारी मनिषा पोखरणकर यांच्यासह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा
गुळवे आणि आरती शिंगणे यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू आहे..दरम्यान सत्र न्यायालयाने या सहा जणांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी कनिष्ट न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. कनिष्ट न्यायालयात डिसेंबर पासून खटला सुरू झाला असला तरी गेल्या पाच महिन्यात केवळ एक साक्षीदार तपासण्यात आला. त्याची साक्षही अद्याप पूर्ण झालेली नाही. या खटल्यात सुमारे 150 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 50 साक्षीदार तपासले जातील. जर अशा प्रकारे खटला असाच सुरू राहिला तर दोन ते तीन वर्षे खटल्याची सुनावणी लांबण्याची भीती व्यक्त केली. तसेच गेले 22 महिने आरोपी तुरूंगात असल्याने जामीन देण्याची विनंती केली. यावेळी न्यायालयाने खटल्याला विलंब होत असेल, तर आधी जामीन अर्ज मागे घ्या आम्ही खटल्याची दैनदिन सुनावणी घेण्याचे आम्ही आदेश देऊ असे बजावले. आरोपींच्या अर्जाची सुनाणी 17 जून पर्यंत तहकूब ठेवली.