वाहनांच्या नुकसानीचीही भरपाई द्या
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे दहिवडी-फलटण रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून त्यांचे नुकसान होत आहे. पिकांप्रमाणेच नुकसानग्रस्त वाहनांचेही पंचनामे करून वाहनधारकांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी प्रतिक्रिया बिजवडी ता.माण येथील विकी अडागळे यांनी व्यक्त केली.
गोंदवले – दहिवडी-फलटण या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
माण, खटाव व फलटण या तालुक्यांमध्ये परतीचा दमदार पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना व रस्त्यांनाही बसला आहे.
सततच्या पावसमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे दहिवडी-फलटण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. दहिवडीवरून फलटणकडे जाताना कन्या विद्यालयानजीक मोठे खड्डे पडले आहेत. माउली मंगल कार्यालय ते वीटभट्टी, वडगावमधील खंडोबा मंदिर ते पांगरीतील बिरोबा मंदिर, पांगरी एस. टी. स्टॅंड ते साई ब्रिलियंट शाळा, बिजवडीत ज्योतिबा मंदिरासमोरील पुल ते हायस्कूलनजीकचा पूल, शिंदे वस्ती ते मोगराळे घाट, मोगराळे घाट ते दडस वस्ती पूल, दुधेबावी ते झिरपवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
या मार्गावरील पाच ते सहा पुलांवरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून गेल्याने तेथील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालक खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करत असताना अपघात झाले आहेत.खड्ड्यांमध्ये वाहने आदळून नुकसान होत आहे. मोगराळे घाटात खराब रस्त्यामुळे चढावर अवजड वाहने अनेकदा बंद पडत आहेत. वाहनांमधील प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती तत्परतेने करावी, अशी मागणी होत आहे.