माधव विद्वांस
इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, मराठी भाषेचे पाणिनी, ग्रंथकार आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबईत खेतवाडी येथे झाला. निधन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाले. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड हे त्यांचे मूळगाव. त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. आजोबांच्या निधनानंतर दादोबांच्या वडिलांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची झाली. त्यांचे घरही कर्जापोटी सावकाराने घेतले. अशा अवस्थेत मातोश्री काशीबाईने हे घर सावरले, इतकेच नव्हे तर लोकांकडे आर्जव करून त्यांच्याकडून कागद, लेखण्या, पुस्तके मागून पांडुरंग यांना चार अक्षरे शिकविली.
सुरुवातीला त्यांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांना मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळीच्या (एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट) शाळेत घालण्यात आले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 1835 साली दादोबा त्याच शाळेत असिस्टंट टीचर ह्या पदावर कामाला लागले. दरम्यान काही काळासाठी नबाबाच्या मुलाला इंग्रजी शिकविण्यासाठी एल्फिन्स्टंट इन्स्टिट्युटमधील वरिष्ठाच्या सांगण्यावरून दादोबा इंदूरला गेले होते. वर्ष 1833 मध्ये शिक्षण चालू असताना आपण मराठीचे व्याकरण लिहावे अशी त्यांना इच्छा झाली. प्रश्नोत्तर-स्वरूपात त्यांनी तसे लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच पसंत न पडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1836 साली प्रकाशित केली.
1850 साली शिक्षण विभागासाठी या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. मेजर थॉमस कॅन्डी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ही आवृत्ती तपासून घेतली व अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून शाळा खात्याकरता प्रकाशित करण्यात आली. वर्ष 1865 मध्ये व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती “मराठी लघु व्याकरण’ ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. वर्ष 1865 मध्ये मोरोपंतांच्या “केकावली’वर “यशोदापांडुरंगी’ ही गद्य टीका त्यांनी लिहिली. मराठी नकाशांचे पुस्तक (1836), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (1860), धर्मविवेचन (1868), पारमहंसिक ब्राह्मधर्म (1880) आणि शिशुबोध (1884) अशी विविध प्रकारची ग्रंथरचना त्यांनी केली. त्यांचे इंग्रजीमधील आत्मचरित्र त्यावेळचे अव्वल आत्मचरित्र म्हणून ओळखले जायचे.
दादोबांचे जीवन सामाजिक चळवळींशी निगडित झालेले होते. त्यामुळे त्यांच्या आत्मचरित्रात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे पडलेले प्रतिबिंबही दिसून येते. त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने “मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले गेले. वर्ष 1878 मध्ये त्यांनी लिहिलेल्या स्वीडिश तत्त्वज्ञ स्वीडनबॉर्ग यांच्या ग्रंथावर “अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग’ या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती. ते पुरोगामी विचारांचे होते. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला “विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पद्मजी यांच्या “यमुनापर्यटन’ या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला. मराठी भाषेचे पाणिनींना अभिवादन.