मालेगाव :‘कोरोना’ सारख्या महामारीने संपूर्ण जगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात आल्यामुळे यावर मात करण्यात आपण मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. प्रशासनामार्फत युद्धपातळीवर काम सुरू असून त्याला नागरिकांचा प्रतिसादही तितकाच गरजेचा आहे. कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही, आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमीका घ्यावी, असे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले. मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात ‘कोरोना’च्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, लॉकडाऊन (संचारबंदी) च्या काळात नागरिकांचा मुक्त संचार ही चिंतेची बाब आहे. पोलीस प्रशासनाने याला वेळीच आवर घालावा. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा, महाविद्यालये व खाजगी रुग्णालये तात्काळ अधिग्रहीत करावीत. मालेगाव शहरामध्ये पावरलूम सारखा मोठा व्यवसाय असून या ठिकाणी कार्यरत असणार मजूरवर्ग मोठा आहे. यापैकी बऱ्याच मजूरांना दमा सारख्या आजाराने ग्रासले आहे. अशा नागरिकांना ‘कोरोना’ आजाराची लागण होण्याचा संभाव्य धोका अधिक असल्याने वेळीच उपचार घेतल्यास कोरोना आजारावर मात करणे शक्य होणार असल्याचे मंत्री भुसे यावेळी म्हणाले.