मुंबई- राज्यात करोना आणि लॉकडाऊनचा फटका व्यापारी, सर्वसामान्य यांच्यासह डबेवाल्यांनाही बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान 3 हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी केली आहे.
राज्यात करोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डबेवाल्यांनी 19 मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत विस्कटली आहे.
शहरातील काही शासकीय, निमशासकीय, तसेच कॉर्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशत: का होईना रूजू होऊ लागला आहे. अनेक चाकरमानी डबेवाल्याला फोन करुन डबे पोहोचण्याबाबत विचारणा करत आहे.
पण जोपर्यंत लोकलसेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत डबेवाला कामावर रुजू होऊ शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबईतील लोकल सेवा लवकरात लकर सुरु करावी किंवा डबेवाल्यांची सेवा अत्यावश्यक समजत त्यांना लोकलने प्रवास करण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. त्यामुळे जो पर्यंत लोकल सेवा सुरु होत नाही, तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही, असे मत सुभाष तळेकर यांनी व्यक्त केलं आहे.