भुवनेश्वर – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता अधिक तीव्र झाल्याने त्यातून चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे असा इशारा वेधशाळेने दिला आहे. या चक्रीवादळाचा ओडिशा आणि आंध्रप्रदेशला धोका असल्याचाही इशारा वेधशाळेने दिला आहे.
सध्या हे चक्रीवादळाचे केंद्र गोपालपुर समुद्र किनाऱ्यापासून 510 किमी अंतरावर आहे. तर आंध्रप्रदेशच्या कलिंगपट्टणमपासून हे केंद्र पुर्वेकडे 590 किमी अंतरावर आहे. सध्या अतितीव्र कमीदाबाच्या पट्टयाच्या स्वरूपात असलेली ही स्थिती पुढील 12 तासांत चक्रीवादळात परावर्तीत होण्याची शक्यता आहे असे वेधशाळेने म्हटले आहे.
हे चक्रीवादळ गोपालपूर ते कलिंगपट्टणम या दरम्यानच्या किनाऱ्यावर 26 सप्टेंबरच्या संध्याकाळी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या सागरी किनाऱ्याच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.