मुंबई: मध्यपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्तिशाली क्यार या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून ते वायव्येला ओमानच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोवा, कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
क्यार चक्रिवादळ कर्नाटकच्या किनारपट्टीपासून दूर सरकत असल्याने पाऊस व वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. येत्या 24 तासांच्या पूर्वानुमानानुसार मध्यम पाऊस राहील आणि किनारपट्टी व मालनाड भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.
वादळामुळे समुद्रात भरकटलेल्या नौकांसाठी भारतीय तटरक्षक दलाने शोध आणि मदतकार्य वेगाने सुरू केले आहे. आतापर्यंत 19 मच्छिमारांची सुटका केली असून, सुमारे एकवीसशे बोटींना सुरक्षित ठिकाणी जायला मदत केली आहे.
कर्नाटकची किनारपट्टी आणि या राज्याच्या दक्षिणेकडच्या अंतर्गत भागातल्या अनेक जिल्हयात तुरळक ठिकाणी आणि उत्तरेकडच्या अंतर्गत भागात पुढल्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.