महाड – तौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
महाड येथे देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी वादळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी फडणवीस म्हणाले, या चक्रीवादळाचा लॅण्डफॉल हा गुजरातमध्ये झाला असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यात खूप मोठ्याप्रमाणात गावे उद्ध्वस्त झाली असल्याने काल पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी पाहणी करून तातडीने मदत घोषित केली. त्या मदतीची जी प्रेस नोट आहे त्यातच उल्लेख केलेला आहे, की अन्य राज्यांना देखील यामध्ये मदत होणार आहे.
या चक्रीवादळामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दोन केंद्रशासित प्रदेशात नुकसान झालेले आहे. आता यामध्ये केरळ किंवा तामिळनाडू ही तर भाजपची राज्य नाही किंवा आपण दुसरा विचार केला, तर गोवा व कर्नाटक ही भाजपची राज्य आहेत. तरी देखील काल घोषणा गुजरातची झाली आहे. या सगळ्या राज्यांना मदत मिळणार आहे.
एवढच नाही तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसडीआरएफ हा राज्याकडे असतो, केंद्र सरकार एनडीआरएफमधील एसडीआरएफमध्ये पैसे आगाऊ देते. ते आपल्याला मिळालेले आहेत आणि एसडीआरएफमधून अशाप्रकारच्या कुठल्याही वादळात किंवा घटनेत राज्य सरकारने मदत करायची असते आणि पुन्हा ते जे पैसे राज्य सरकारने वापरले. ते केंद्र सरकार परत करत असते किंवा नव्याने देते. हे सगळं राज्याला माहिती आहे, असे असतानाही यावर जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.