नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातील अम्फान महाचक्रीवादळ आज दुपारनंतर पश्चिम बंगालच्या सुंदरबन, दिघा आणि बांगलादेशामधील हातीया भागात अखेर धडकले. या चक्रीवादळाचा जमिनीवर आल्यानंतरचा वेग ताशी 155 ते 185 किलोमीटर होता. यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीवर मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा या वादळाने चुराडा केला असून दोन जण याच्या तडाख्यात मरण पावले. हे वादळ आणखी आठ ते दहा तास कायम राहील,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पश्चिम बंगाल,ओडिशामधून बुधवारी चार लाख तर बांगलादेशातून वीस लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
बंगालच्या उपसागरात शनिवारी अम्फान चक्रीवादळ सुरू झाले. त्याची तीव्रता वाढत गेली. त्याचे सोमवारी महाचक्रीवादळात रूपांतर झाले तर बुधवारी दुपारनंतर जमिनीवर वादळ धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊ लागली. वादळाची संहारक लक्षणे सकाळी दहापासूनच पश्चिम बंगालमध्ये जाणवू लागली. दुपारी तीनच्या सुमारास ते जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी वादळाचे केंद्र हे पश्चिम बंगालच्या दिघापासून 65 किलोमीटर तर बांगलादेशाच्या सागर बेटापासून 35 किलोमीटरवर होते. त्यावेळी हे वादळ वीस किलोमीटर वेगाने जमिनीकडे झेपावत होते. या वादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि परदीप आणि परिसरावर सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यत परदीप येथे 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे वादळ परदीपच्या किनाऱ्यापासून दुपारनंतर उत्तरकडे पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकू लागले. अम्फान या वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये 14 किलोमीटर उंचीचे ढग जमा झाले होते. किनारपट्टीलगत सुमारे चार मीटर उंचीच्या लाटा उसळल्याने सखल भागात पाणी भरू लागले. दुपारी चारनंतर त्याची तीव्रता कमी होऊ लागली. बिहारसह सिक्किम आणि इशान्य भारतातील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या चक्रावातात विटांची घरे कोसळली. जुन्या इमारती आणि विजेचे खांब जमीनदोस्त झाले. शेतातील पिके, फळझाडे यांना तडाखा बसला. कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हावडा जिल्ह्यात एक आणि परागणा जिल्ह्यात एक जण मरण पावला. वादळाची तीव्रता अद्याप कायम आहे. मदत कार्यासासाठी प. बंगाल आणि ओडिशात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 24 तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील सुमारे चार लाख नागरिकांना बुधवारी सुरक्षित ठिकाणी हलविल्याचे एनडीआरएफचे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले.