बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने संघातील ताहिला मॅकग्रा या खेळाडूचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही खेळवल्यामुळे आता मोठा वाद सुरू झाला आहे.
महिलांच्या टी-20 क्रिकेटमध्ये झालेल्या या अंतिम लढतीत भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या करोना चाचणीत ताहलिया पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते, तरीही ऑस्ट्रेलियाने तिला या लढतीत खेळवले.
सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता व त्यात ती मास्क घालून फलंदाजीला जाण्यासाठी प्रतीक्षा करत असल्याचे दिसत आहे. करोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यावरही तिचे संघातील स्थान कायम राखले गेले व ती केवळ अन्य खेळाडूंपासून दूर बसली होती. सामन्यादरम्यानही अन्य खेळाडू ताहिलाशी संपर्क येऊ देत नव्हते.
भारताची फलंदाजी सुरू असताना तिने शफाली वर्माचा झेल घेतला तेव्हाही अन्य खेळाडूंनी लांबूनच तिचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कितीही उपाययोजना केल्या असल्या तरीही एक करोनाबाधित खेळाडूला मैदानात उतरवणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून, सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ, आयसीसी व राष्ट्रकुल समिती यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे.