बर्मिंगहॅम – अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडचा सनसनाटी पराभव केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारत आणखी पदक निश्चित केले आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 160 धावांपर्यत मजल मारता आली. भारताने अवघ्या 4 धावांनी सामना जिंकला.
स्नेह राणाची फिरकी प्रभावी भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने एकवेळ सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. पण स्नेह राणाच्या ऑफ स्पिनने कमाल केली. या सामन्यात राणा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने आपल्या 4 षटकात 28 धावांत दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर धाडले. अखेरच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. अशा परिस्थिती राणाने अचूक गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दीप्ती शर्माने एक विकेट घेत तिला सुरेख साथ दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार अंतिम सामना
अंतिम फेरीत भारताचा सामना हा ऑस्ट्रेलिया संघाशी होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश करताना केवळ एक सामना गमावला आहे. यामुळे भारतीय महिला संघचा आत्मविश्वास वाढला आहे. परिणामी, भारतीय संघ अंतिम सामन्यात बहारदार खेळ करून सुवर्णपदक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा सुवर्णपदक सामना रविवार, ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची उपकर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधनाने धमाकेदार अर्धशतक झळकावले. तिच्या अर्धशतकी आणि जेमिमाह रॉड्रिगेजच्या नाबाद 44 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 5 बाद 164 धावांचे लक्ष्य दिले. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 तर दिप्ती शर्माने 22 धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने निर्णायक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 2.5 षटकांत 28 धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने आपले फलंदाजीतील आक्रमण सुरू ठेवत लक्ष्य आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. इंग्लंडसाठी सलामीवीर डॅनी वॅटने 35 धावांची झंझावाती खेळी केली. तिच्याशिवाय कर्णधार नॅट सिव्हरने 41, ऍमी जोन्सने 31 धावा जोडत इंग्लंडला लक्ष्याच्या जवळ पोहोचवले. परंतु भारतीय संघाने सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करत सामन्यात पकड मजबूत केली. विशेष म्हणजे दमदार क्षेत्ररक्षण केल्याने इंग्लंडचे तीन फलंदाज धावबाद झाले.