एजबस्टन – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (शनिवार) भारतीय महिला संघ व इंग्लंड महिला संघ यांच्यात उपांत्य फेरीची लढत होत आहे. या स्पर्धेत सलामीची लढत वगळता सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या भारतीय महिला संघाला यजमान संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करावी लागणार आहे.
या स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकस्तानवर मात करत त्यांची वाटचाल विजयी मार्गावर सुरू झाली. त्यानंतर भारतीय संघाने बार्बाडोसचा मोठा पराभव केला व उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सरस कामगिरी केली आहे. सलामीवीर व स्टार फलंदाज स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीक्स यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे, तर गोलंदाजीत रेणुका सिंग व दीप्ती शर्मा यांनी अफलातून कामगिरी केली आहे. रेणुका सिंग ठाकूरने तर या स्पर्धेत तीन सामने खेळताना आतापर्यंत 9 गडी बाद केले आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही तिच्यावरच मदार राहणार आहे.
We thought Jemimah is ready to bat at No. 3. She has the experience of playing in England and we felt we must promote her in the batting order: Head Coach @imrameshpowar #INDvENG pic.twitter.com/7gKHf4vWv5
— BCCI Women (@BCCIWomen) August 5, 2022
तसेच फलंदाजीत तानिया भाटिया व दीप्ती शर्मा यांना, तर गोलंदाजीत पूजा वस्त्रकार, मेघना सिंग यांनाही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. हा सामना जिंकत अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी भारताला अष्टपैलू खेळ करावा लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंडची फलंदाजीदेखील डॅनियल वॅट, सोफिया डन्कले, नताली शिव्हर, एलिस केप्सी यांच्यामुळे भक्कम आहे, तर गोलंदाजीत सोफिया एक्केलस्टोन, साराह ग्लेन, इजी वोंग यांचे भारतासमोर आव्हान राहणार आहे.