बर्मिंगहॅम – जेमिमा रॉड्रिक्स, शफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांची फलंदाजी व रेणुका सिंगची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने बार्बाडोसचा तब्बल 100 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
साखळी फेरीतील भारताचा हा अखेरचा सामना होता. या स्पर्धेत पदकाची आशा कायम राखण्यासाठी हा सामना भारतीय संघाला जिंकणे महत्त्वाचे होते. बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 4 गडी गमावून 162 धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोस संघाला भारतीय गोलंदाजांसमोर विशेषतः रेणुका सिंगच्या गोलंदाजीमुळे मर्यादित 20 षटकांत 8 बाद 62 धावाच करता आल्या. बार्बाडोसकडून केशोना नाईट्सने 16 तर शकिरा सेलमनने 12 धावा केल्या. मात्र, अन्य कोणत्याही फलंदाजाला दोनअंकी धावा करता आल्या नाहीत. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले.
तत्पूर्वी, भारताच्या डावाची सुरुवात धडाक्यात करताना सलामीवीर शफाली वर्माने 26 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. तर, जेमिमा रॉड्रिग्जने 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. जेमिमाच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील हे सातवे अर्धशतक ठरले. तळात दीप्ती शर्मानेही नाबाद 34 धावा करून संघाला 4 बाद 162 अशी समाधानकारक मजल मारून दिली. जेमिमा आणि दीप्ती यांनी पाचव्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली.
भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाने थाटात पुनरागमन करत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या महिल्यांच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
संक्षिप्त धावफलक –
भारत :- 20 षटकांत 4 बाद 162 धावा. (जेमिमा रॉड्रिक्स नाबाद 56, शफाली वर्मा 43, दीप्ती शर्मा नाबाद 34, सानिका ब्रुस 1-17, शकिरा सेलमन 1-20, हेली मॅथ्युज 1-29). Vs बार्बाडोस :- 20 षटकांत 8 बाद 62 धावा. (केशोना नाईट्स 16, शकिरा सेलमन 12, रेणुका सिंग 4-10).