महेश जाधव
महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; खटाव तालुक्यातील स्थिती
मायणी – खटाव तालुक्यात महावितरण कंपनीने मीटर रीडिंगसाठी खासगी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या ठेकेदारांकडील कर्मचारी ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग वेळेत घेतात. मात्र, बिल भरण्याची तारीख निघून गेल्यानंतर ग्राहकांच्या हाती वीज बिले पडत असल्याने त्यांना दंडाचा भुर्दंड नाहक सोसावा लागत आहे.
वेळेत वीज बिले न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण कंपनीकडून सुरू आहे. मात्र, दरमहा प्रामाणिकपणे वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना वेळेत बिले मिळत नसल्याने दंडाची रक्कम भरावी लागत आहे. मीटर रीडिंग घेणारे वेळेत नोंदी घेतात. मात्र, बिलांचे वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. ठेकेदारांनी कमी पगारावर नेमलेले कर्मचारी वीज बिलांचे वितरण कोणत्याच महिन्यात वेळेवर करत नाहीत.
काही वेळा पहिल्या महिन्याचे बिल भरताच दुसऱ्या महिन्याचे बिल हातात पडते. मागील भरलेल्या महिन्याचे वीज बिल चालू बिलात वाढवून आलेले असते. त्यामुळे वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड आणि मन:स्ताप सहन करावा लागतो. ठेकेदारांकडील कर्मचारी पगार परवडत नसल्याने अन्य कामे करत जमेल तसे बिलांचे वाटप करतात. त्यामुळे मीटर रीडिंग आणि बिलांचे वाटप यामध्ये बराच अवधी निघून जातो. त्याचा अकारण त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
याबाबत महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिले त्या त्या महिन्याच्या अंतिम मुदतीपूर्वी वितरीत करावीत आणि ग्राहकांना बसणारा दंडाचा भुर्दंड महावितरणने टाळावा, अशी मागणी होत आहे.