संध्याकाळच्या उतरत्या क्षणांत अचानक वारा भरभरून वाहू लागतो आणि उन्हानं सुकलेल्या पानांना संगतीला घेत भिंगोऱ्यांचा खेळ मांडतो. सुकलेली पानं, गळलेली; बहावा, गुलमोहर, पलाश यांची मखमली फुलं, सारं काही या भिंगोऱ्यात सामील होतात. वारा त्यांना घेऊन जातो ढगांच्या पार… अन् येताना घेऊन येतो पावसाच्या उधळलेल्या खिल्लाराला… एकमेकांना धडकत, डुरकत येणारे हे पावसाचे ढग, बघता बघता रंगात येतात अन् विजेची टिपरी पडली की यांची दंगल उसळते. साथीला भिंगोरणारा वारा असतोच आणि रपारप पावसाचे थेंब येऊन आदळायला लागतात. सोबत करायला गाराही असतातच…
दुपारच्या उन्हानं सारी गल्ली सुस्तावलेली असतानाच हा वळीव अचानक टपकायचा आणि सारी गल्ली धडपडत जागी व्हायची. मग काय, एकच धांदल उडायची. कुणाचे कपडे, कुणाचं अंगणात ऊन्हाला ठेवलेलं धान्य,तर कुणाची वाळवणं… मिरच्या, सांडगे, पापड, कुरड्या… काय अन् काय… पण वळवाला कसली आलीय या सगळ्याची फिकीर? धावत यायचं अन् बरसायला लागायच… एवढंच तर त्याचं काम. त्याला आपल्या सखीला भेटायची घाई. तो यायचा अचानक अन् बरसायचा ओतप्रोत… अगदी घुमर धरल्यासारखा. जणूकाही आपल्या सखीच्या मिलनासाठी अधिरलेला तृषार्त प्रेमिकच आहे, अन् धरा ही तेव्हा सुगंधात अशी दरवळायची की तिची तपस्या सुफळ संपूर्ण होऊन तिची प्रतीक्षा संपवण्यासाठी महादेव शिव प्रत्यक्ष पावसाच्या रूपात येईल अन् म्हणेल, अपर्णे… बघ! मी आलोय.
क्षितिजाचे बदललेले रंग आणि झाडांवरच्या कोटरांतल्या पाखरांचे सायं-अभंग सारेच काही तो वळीव अचानक येऊन चोरून न्यायचा. बदल्यात ओलाचिंब गारव्याचा अनुभव देऊन जायचा. गारवा… तनाला, मनाला अन् त्या पाखरांच्या चोचीलाही. नुकतीच फलशोभन होऊन कैऱ्या लगडलेली आंब्याची झाडं तर पूर्ण न्हाऊन पुन्हा तजेलदार व्हायची. सृजनानंतर गर्भारणीच्या चेहऱ्यावर आलेली आभा त्यांच्या गडद हिरव्या पानांवर दिसायची. वाऱ्याच्या खेळात सामील होत पावसानं त्यांनाही घोळात घेतलेलं असायंच आणि त्यांच्या बुंध्यांशी बाळकैऱ्यांचा खच पडलेला असायचा.
काही पाडाला आलेल्या देखील खाली उतरायच्या. आम्ही मुलं या संधीचा फायदा उचलून नंतर या कैऱ्या लंपास करायचो. पण त्याआधीची बारी गारांची असायची. पाऊस पडायला लागला की सटासट गारांचाही गोफणगुंडा सुरू व्हायचा अन् आम्ही मुलं अंगणात, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणत गारा वेचायला धावायचो. एका हातात वाटी धरून, दुसऱ्या हाताने गारा गोळा करताना मधेच एखादी गारं पोटात गडप व्हायची. भिजत भिजत कुडकुडत गोळा केलेल्या गारा पोटात गेल्या की अजूनच आइसकॅंडी झाल्यासारखं वाटायंच.
मोठी होत गेले तसे या वळवाच्या पावसाचे संदर्भही बदलत गेले. मनात उमलणाऱ्या तारूण्यसुलभ भावनांमध्ये वळीव, स्वप्नांतल्या राजकुमारासारखा वाटू लागला. परीकथेतला राजकुमार नाही का घोड्यावरून येतो आणि राक्षसाच्या कैदेतल्या राजकुमारीला सोडवून नेतो… तसंच काहीसं वाटायंच अन् त्या अचानक आलेल्या पावसाला अंगावर झेलावंस वाटायंच. त्याचं अचानक येणं देखील मोहवायचं. मन अध्धर अध्धर व्हायचं. आपण भिजत असताना मनाच्या कोपऱ्यातला तो आपल्याकडेच बघतोय की काय? या शंकेनं त्या भिजत्या पावसातही गालांवर गुलमोहर फुलायचे अन् वळीव बरसत राहायचा तनावर… मनावर. त्याचा धसमुसळेपणा, तिरकसपणा, लहरीपणा हवा-हवासा वाटायचा. वळीव मनावर दाटायचा…
आता वळीव येतो तेव्हा सोबत आठवणींचे ढग भरून आणतो. वाऱ्याच्या भिंगोऱ्यांमधे त्या आठवणींचे कण भिरभिरत राहतात. मधेच एखादी वीज कडाडल्यानंतर एखादी जीवघेणी आठवण तळपून जाते अचानक. मी खिडकीची तावदानं लावून घेते, जणू खिडकीच्याही डोळ्यांतून मूक हुंदके बरसायला लागतात अन् तावदानांवर जमायला लागतात भावनांचे खारे ओघळ… भरून ओतप्रोत होतात डोळे, जसे भरलेले डोह असावेत. आता मात्र मनातल्या वळिवाची झिरपणं गरजेची… एकदा सुरू झाला की मग थांबता थांबत नाही. अशावेळी मला माझ्या ओंजळीचा आसरा घ्यावा लागतो. भर ओसरतो अन् खिडकीच्या तावदानांवर जमू लागतात पावसाची बाळे. त्यातली काही पुन्हा एकवार माझ्या डोळ्यांतून ओघळतात.
आपल्या प्रतिबिंबासकट माझ्या ओंजळीत उतरतात… आभाळ निवळताना आमच्यात लपाछपीचा खेळ रंगतो. पन्हाळीतून उंडारणाऱ्या या पावसाच्या बाळांना आता मी ओंजळीत झेलते. त्यांच्या त्या टपोरपणात मला इंद्रधनुष्य दिसतो. जसे की आकाशातली चांदणबाळे पावसाच्या थेंबात लपून मला भेटायला आली असावीत. मी माझ्या स्वप्नांचे रंग वापरून त्यांना नटवते, सजवते तर त्या पावसाच्या बाळांना जणू इवलाले पंख फुटतात अन् वाऱ्याच्या लकेरीसोबत ही बाळे पुढच्या प्रवासाला निघतात… फुललेली ही लकेर मालवलेल्या धुक्यात वितळत जाते. पावसाची बाळे मात्र वाऱ्यासोबत मातीचा दरवळ पांघरून भूर्र उडून जातात… मागे खुणा ठेवून…
आता पाऊस झरून ढग मोकळे झालेले असतात. सारे मळभही सरलेले असते. मग मोकळे झालेले ढग आवेगाने एकमेकात विरघळतात. विरून जातात. डोळ्यांत दाटलेला वळीव अबोल निबोल होतो. डोळ्यांत उमलताना सजल नयन होतो. सरींचे घनगर्द पंख फैलावून त्यातले आठवणींचे तुषार झटकत वळीव पुन्हा दूरदेशी जायला निघतो…
पाऊस असा झरल्यावर, मातीचे अत्तर परिमळ
पानांच्या ओल्या देही, थेंबांचे ओले दरवळ
अचानक येऊन धांदल उडवून देणारा हा वळीव येतो एखाद्या वावटळीसोबत, बरसतो, लहरतो, आवेगतो, घुमरतो, ओतप्रोत होऊन झरतो. जाताना मात्र सोबत नेतो अत्तराचे दरवळ. प्रीतीच्या आठवणींचे,विरहाच्या सार्थकतेचे परिमळ.
आठवणींचा वळीव ही असाच असतो. विसरता विसरत नाही अन् थांबता थांबत नाही. येतोही अचानक आणि जातोही अस्वस्थ करून.
झरते मूक कुशीवर, वळिवाची सर ही कोमल
विरघळल्या आठवणींची, जणू मनात सजते मखमल
मानसी चिटणीस