पुणे – काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. असे झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. याविषयी राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. याचाच संदर्भ देत भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावर अजित पवारांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही आणि ते कधी होणार पण नाहीत, असा टोला निलेश यांनी ट्विटरवरुन लगावला होता. तसेच अजित पवार यांना कसेतरी उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे, असेही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं होते.
पुण्यात निलेश राणे यांनी केलेल्या टीकेप्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले कि, अरे जाऊ दे… कावळयाच्या शापनं गुरं कधी मरत नसतात. हे तुला माहिती आहे ना? त्यांचं आणखी नाव घेऊन त्यांना काय महत्व द्याचं? असे उत्तर त्यांनी दिले आहे.
दरम्यान, निलेश राणे यांनी ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे. उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचेही त्यांनी म्हंटले होते.