मुंबई : राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरापासून ते आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चादेखील रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यात कोण-कोणत्या नेत्यांचा समावेश करण्यात येतो वरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय अस्थिरता असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हीकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी, अशी आमची इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
दरम्यान, मंत्रीमडंळ विस्ताराबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले,“धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळविस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे”, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, सोमवारी परभणीत झालेल्या पत्रकार परिषदे बोलताना, प्रहार संघटनेने दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली असून येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.